मेट्रो आणि मलवाहिनी प्रकल्पाची कामे पूर्ण होताच होणार परिसर सुशोभित
कोस्टल रोडच्या सल्लागाराची घेतली जाणार मदत
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
पवई तलावाच्या दक्षिण बाजूस आदि शंकराचार्य मार्गालगत परिसराचा मागील १८ वर्षांपासून विकास रखडलेला असून आता याठिकाणी मेट्रो रेल्वेच्या स्थानकांची कामे पूर्ण झाल्यांनतर याचा विकास करण्यात येत आहे. या परिसराचे सुशोभिकरणाचे काम पूर्ण करण्यात आल्यांनतर पर्यटकांसाठी तिकीट आकारणी करण्यात येणार आहे, तसेच अंतर्गत भागांमध्ये फूड कोर्टद्वारे खाद्यपदार्थांची विक्रीची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
पवई तलावाच्या दक्षिण बाजूस आदि शंकराचार्य मार्गालगत सुमारे पावणे दोन किमी लांबीचा पदपथ आहे. पदपाथाच्या दोन्ही टोकांना गणेशघाट आणि पवारवाडी हे दोन विसर्जन घाट आहेत. हा पदपथ सन २००८ मध्ये विकसित करण्यात आलेला आहे. त्यानंतर सुमारे १८ वर्षांपासून पदपथाचे सुशोभीकरण करणे, दुरुस्ती करणे यासाठी कोणतेही काम करण्यात आले नसल्याचे जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सद्यस्थितीत पवई तलाव आदि शंकराचार्य मार्गालगत मेट्रो मार्गिका क्रमांक ०७ अंतर्गत रामबाग आणि पवई तलाव ही स्थानके येत असून या दोन्ही स्थानकांवर चढणे आणि उतरणे करीता जीने, सरकते जीने पवई तलाव पदपथावरुन बांधण्यात येत आहेत तसेच महानगरपालिकेच्या मलः निसारण प्रकल्प अंतर्गत पवई तलावात येणारे सांडपाणी रोखण्याकरता पदपाथाखाली मलजल वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या दोन्ही कामांमुळे पदपाथाची दुरवस्था झालेली आहे. या बाबतीत पवई तलाव परिसरातील नागरिक, स्वयंसेवी संस्था लोकप्रतिनिधी यांच्या तक्रारी या विभागास प्राप्त झाल्या.
त्यानंतर पवई तलाव पुनरुज्जीवन संदर्भात सचिव, राज्याचे मुख्यमंत्री अध्यक्षतेखाली दिनांक २० जुलै २०२५ रोजी झालेल्या बैठकीत 'पवई तलावाच्या आदि शंकराचार्य मार्गालगतच्या भागाचा विकास करणेबाबत प्रस्ताव तयार करण्यात यावा' असे निर्देश दिलेले आहेत. या प्रस्तावामध्ये महानगरपालिकेच्या अखत्यारीतील पवई तलावास लागून असणारे भूखंडांचा विकास करणेबाबत व्यवहार्यता तपासावी. तसेच, या प्रकल्प आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण असावा म्हणजेच सदर प्रस्ताव पूर्णत्वास आल्यानंतर पर्यटकांसाठी तिकीट आकारणी करणे, फूड कोर्टद्वारे खाद्यपदार्थांची विक्री इ. द्वारे आर्थिक बाजूने स्वावलंबी असेल अशाप्रकारे संयुक्तपणे आराखडा तयार करुन सक्षम अधिकाऱ्यांच्या मंजूरीसाठी सादर करावा,असे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे याचा भागाचा पुनर्विकासकरता तपशीलवार प्रस्ताव आणि तांत्रिक आराखडा तयार करण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्पांमध्ये सल्ला देणाऱ्या सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. या कामासाठी सल्लागार म्हणून ए ई कॉम या कंपनीची म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या सल्लागार सेवेसाठी पावणे दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
या पवई तलावाचे एकूण क्षेत्र २२३हेक्टर असून पाणलोटाचे क्षेत्र ६.६१ चौ. कि.मी. आहे. तलावात अनेक जातीचे मासे, मगरी असून तलाव परिसरातील अनेक जातीचे स्थलांतरित पक्षी वर्षातील काही काळ दृष्टीस पडतात. अशा प्रकारे तलाव व परिसरातील जैव विविधता निसर्ग समृद्ध असल्याने या भागाचे सुशोभीकरण तथा पुनर्विकास केल्यानंतर याठिकाणी पर्यटकांची मोठ्याप्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.