Nashik : सीएचे अपहरण, बेल्टने मारहाण अन् १८ लाखांची खंडणी! नाशिकमध्ये थरारक गुन्ह्याने खळबळ

Nashik : नाशिक शहरात घडलेल्या एका घटनेनं खळबळ उडाली आहे. एका चार्टर्ड अकाउंटंटचे तब्बल १८ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून त्याला रात्रभर डांबून ठेवत अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मदतीच्या उद्देशाने गेलेल्या सीएला पैशांच्या व्यवहाराच्या जाळ्यात अडकवत आरोपींनी थेट अपहरण करून बेल्टने बेदम मारहाण केली. या घटनेमुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली असून उपनगर पोलिसांनी (Upnagar Police) दोघांना अटक केली आहे. तर इतर साथीदार अद्याप फरार आहेत.



नेमकं काय घडलं ?


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, २३ मे रोजी मुंबई नाका (Mumbai Naka) परिसरातील एका हॉटेलमध्ये रॉक वेस्ट कंपनीच्या बैठकीदरम्यान नाशिकरोड येथील चार्टर्ड अकाउंटंट अक्षय लोया (Akshay Loya) यांची अविनाश पारेकर आणि हिमांशू पाटील यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर गुरुवारी दुपारी रुंग्टा शॉपिंग हब परिसरात पुन्हा त्यांची भेट झाली. यावेळी आरोपींनी अक्षय यांच्यासमोर पंधरा लाख रुपये सुरक्षितपणे मुंबईला पाठविण्याचा मुद्दा मांडला.


‘आमच्याकडे १५ लाख रुपये रोख आहेत, ते सुरक्षित मुंबईला पाठवायचे आहेत. तुमच्या ओळखीची व्यक्ती असेल का?’ असा प्रश्न आरोपींनी विचारल्याचे समोर आले आहे. मदतीच्या हेतूने अक्षय पैसे पाठवण्यास तयार झाले. आरोपींनी सांगितल्याप्रमाणे दिंडोरी नाका परिसरात योगेश महाजन नावाच्या व्यक्तीकडे अक्षय पैसे घेण्यासाठी गेले. मात्र, तेथे कांती नावाच्या व्यक्तीने पैसे घेतल्याचे समजल्यानंतर त्यांनी याची माहिती आरोपींना फोनवरून दिली आणि ते पुन्हा घरी परतले.



यानंतर सुरू झाला थरारक खेळ


आरोपी अविनाशने अक्षय लोया यांना रात्री सुमारे दहा वाजता गंगापूररोडवरील पारिजातनगर येथील कार्यालयात बोलावले. तेथे हिमांशू, अविनाश आणि योगेश महाजन उपस्थित होते. आरोपींनी, ‘जो व्यक्ती पैसे घेऊन गेला त्याला कोणीतरी लुटले असून आम्हाला तुझ्यावर संशय आहे,’ असा आरोप करत अक्षय यांच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या अक्षय यांना घराजवळ सोडण्यात आले. मात्र, हा प्रकार इथेच थांबला नाही. अवघ्या काही वेळात पुन्हा फोन करून बिटको चौकाजवळील पेट्रोल पंप परिसरात बोलावण्यात आले. तेथे आरोपी एसयूव्ही वाहनात बसले होते. अक्षय घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी त्यांना जबरदस्तीने वाहनात ओढून घेतले आणि जीवे मारण्याची धमकी देत मारहाण सुरू केली.



जिवंत राहायचे असेल तर...


त्यानंतर आरोपी अक्षय यांना थेट इगतपुरी येथील विसावा लॉजमध्ये घेऊन गेले. तेथे मध्यरात्री त्यांच्या अंगावरील कपडे काढून बेल्टने बेदम मारहाण करण्यात आली. ‘जिवंत राहायचे असेल तर १८ लाख रुपये दे,’ अशी धमकी देत आरोपींनी त्यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत त्यांना लॉजमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. अखेर शुक्रवारी दुपारी अक्षय यांनी आरोपींना, ‘मला घरी जाऊ द्या, मी तुमचे पैसे देण्याची व्यवस्था करतो,’ असे सांगत स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींची दहशत इथेही संपली नाही. आणखी तीन ते चार जणांना बोलावत आरोपींनी थेट लोया यांच्या घरात घुसून कुटुंबीयांनाही मारहाण केल्याचा आरोप आहे.



उपनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल


दरम्यान, अक्षय यांच्या भावाने तत्काळ पोलिसांना फोन केल्याने आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अपहरण, खंडणी, दमदाटी आणि मारहाणीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अविनाश रामकिसन पारेकर (वय ३४) आणि हिमांशू शिरीष पाटील (वय २५) या दोघांना अटक केली असून शनिवारी त्यांना नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील तिसरा साथीदार योगेश महाजन आणि इतर काही संशयित फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.


वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंती शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुयोग वायकर पुढील तपास करीत आहेत.

Comments
Add Comment

Mirabai Chanu : मीराबाई चानूची सोनेरी हॅटट्रिक!

ग्लासगो : भारताची स्टार वेटलिफ्टर आणि ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू हिने ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा

Ind vs Zim : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली टी-२० मालिका; झिम्बाब्वेचा ३-० ने व्हाईटवॉश !

भारताचा ३५ धावांनी दणदणीत विजय ! हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Question Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीविरोधी नवीन विधेयक लोकसभेत सादर होणार

नवी दिल्ली: प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून संसदेत निर्माण झालेला गतिरोध आता संपण्याची चिन्हे असून, आंदोलक

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Narendra Modi : परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात उच्चाधिकार समितीची स्थापना, PM मोदींचा निर्णय

नवी दिल्ली : परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात