Friday, June 12, 2026

संत कबीर

संत कबीर

अपनी कहै मेरी सुनै, सुनि मिलि एकै होय । हमरे देखत जग जात है, ऐसा मिला न कोय।।

आयुष्यात समन्वयाचे महत्व खूप आहे. प्रत्येकाची विचारधारा, पंथ वेगळे असले तरी दोन वेगवेगळ्या विचारसरणीतील किमान समान तत्वे मानून सुवर्णमध्य साधला तर व्यवहारातील अनेक अवघड प्रमेये सहज, सोपी होतात. या रचनेत संत कबीर म्हणतात, तुमचे म्हणणे आिण माझे म्हणणे सांगून वा ऐकून आपापसात ताळमेळ साधून एकमत करावे. या दुनियेतील बरेचसे लोक आपल्या मताबाबत अकारण आग्रही वा हट्ठी असतात आणि एकमेकांना विरोध करण्यातच त्यांचे विचार भरकटत रहातात. जो समन्वयाचा मार्ग अनुसरेल असा कुणी आढळत नाही. समन्वय हा आयुष्यातील महत्वाचा गुण आहे. संत कबीर हे निर्भिड, स्पष्टवक्ते होते. त्यांनी राम रहीम, करीम-केशव, पूजा- नमाज, हिंदू-मुसलमान, ब्राम्हण-क्षुद्र आदी बाबींवर समन्वयवादी भूमिका घेतली. या दोन्ही बाबींना त्यांनी समान मानले. सत्य त्यांच्या विचारधारेचा पाया होता. म्हणूनच समाज, अध्यात्म आणि मानवी आयुष्य यातील विसंगती, ढोंग, खोटेपणा, लबाडी यावर त्यांनी कठोरखणे टीकेचे प्रहार केले. कबिरांनी समन्वय साधला तो मूळ तत्वांच्या बाबतीत. त्यांनी हट्टीपणाला आणि एकांगी विचारांना कधीही साथ दिली नाही. त्यांची भूमिका सत्ववादी आणि समन्वयशील होती. कबिरांचा समन्वयाचा मार्ग आयुष्याला वळण देणारा आहे.

दोन्ही बाजूंच्या विचारांवर एकत्रित साधकबाधक चर्चा केली की विचारांची एकता होते.. आयुष्यात पूर्वग्रहदूषित दृष्टी, हट्टीपणा आणि एकांगीपणा या बाबींचा माणूस जोवर त्याग करीत नाही तोवर आयुष्यातील सत्यमय प्रकाशाचे त्याला दर्शन होणार नाही. मनाची शांती हेच परमसुख वा मोक्ष आहे. मन पूर्ण निर्विकल्प झाले की शांतीचा अनुभव येतो. मग कुठलीच मत-मतांतरे शिल्लक रहात नाहीत. हे मत-मतांतरे ही मनाचीच निर्मिती आहे. मन लीन झाले की विचारांची ही अंतरे मिटून जातात, परम शांती म्हणजे एकता वा समन्वय. मनाची शांती हाच परम सिद्धान्त आहे. मन शांत झाले की मतही लय पावते. मग संघर्षाचे कारणच उरत नाही. सत्याचा मार्ग हाच खरा मार्ग आहे. निष्पक्ष निर्णय नेहमी सत्ताच्याच बाजूने असतो. समतोल विचारानेच मतामतांची अंतरे मिटतात आणि समन्वयाची सुवर्णरेखा साधली जाते. व्यावहारिक मतभेद वा समस्या आपसात चर्चा करून सोडविता येतात. मात्र मनात द्वेष, हट्ट वा आडमुठेपणा असेल तर कुठल्याही समस्येवर मार्ग निघत नाही. आयुष्यातील विविध प्रश्न, मतभेद यावर समन्यय हाच सर्वोत्तम उपाय आहे हे तत्व संत कबिरांनी रचनेद्वारा विशद केले आहे.

__- डॉ. देवीदास पोटे

Comments
Add Comment