नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai) अटल सेतू पुलावरून (Atal Setu Bridge) एका २८ वर्षीय तरुणाने समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलीस, सागरी सुरक्षा यंत्रणा आणि बचाव पथकांकडून संबंधित तरुणाचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू करण्यात आली आहे. (Suicide News)
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक सुभाष रासकर असे या तरुणाचे नाव असून तो पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याचा रहिवासी आहे. रविवारी पहाटे सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी उलवे पोलीस ठाण्यात हरवलेल्या व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Goa Nation ...
प्राथमिक माहितीनुसार, प्रतीक रासकर हा शेअर मार्केटशी संबंधित प्रशिक्षण क्षेत्रात काम करत होता. घटनेपूर्वी त्याने कुटुंबीयांना बाहेर जेवणासाठी जात असल्याचे सांगून घर सोडले होते. त्यानंतर तो अटल सेतू परिसरात पोहोचला. पुलावर कार उभी केल्यानंतर त्याने समुद्रात उडी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने शोधकार्य सुरू केले. समुद्रातील विविध भागांमध्ये शोधमोहीम राबवली जात असून अद्याप तरुणाचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. बचाव पथके आणि संबंधित यंत्रणा सातत्याने परिसराची पाहणी करत आहेत.
या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन केले असून संबंधित तरुणाबाबत कोणतीही माहिती असल्यास त्वरित संपर्क साधण्यास सांगितले आहे.
दरम्यान, अटल सेतूवरून उडी मारण्याच्या घटनांमुळे पुलावरील सुरक्षेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी अधिक प्रभावी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणीही व्यक्त होत आहे.