उत्तंकामुळे गुलीकाची मुक्ती: भालचंद्र ठोंबरे
अधर्मी कृत्ये करणारे, पापी, दरोडेखोर यांना ऋषीमुनींनी केलेल्या उपदेशामुळे त्यांचा भाग्योदय झाल्याची अजामीळ, वाल्मिकी व भृशुंडी यांच्या उदाहरणासारखी अनेक उदाहरणे आपल्या पुराणात व धार्मिक ग्रंथात आहेत. अशाच प्रकारे ऋषी उत्तंकामुळे गुलीक नावाच्या एका दरोडेखोराला मुक्ती मिळाल्याची कथा नारद पुराणात आहे.सत्ययुगात गुलीक नावाचा एक शिकारी होता. तो धनासाठी लोकांना ठार करीत असे शिवाय स्त्रीधन तसेच परस्त्रीयांना पळवून नेत असे. अशा प्रकारे तो अत्यंत क्रूर व लोभी दरोडेखोर बनला. एकदा तो चोरीच्या हेतूने सौवीर राजाच्या राज्यात पोहोचला. त्या राज्यातील ऐश्वर्य पाहून तो चकित झाला. फिरता फिरता तो एका उद्यानातील एका विष्णू मंदिरात गेला. त्या मंदिरात उत्तंक नांवाचा एक ऋषी राहत होता. गुलीकाने मंदिरातील संपत्ती लुटण्याचा प्रयत्न केला, तेव्हा उत्तंकाने त्याला विरोध केला. मात्र गुलीकाने त्याला जमिनीवर पाडून व त्याच्या छातीवर पाय देऊन गुलक उभा राहिला.तेव्हा ऋषी उत्तंक त्याला म्हणाले, “अरे, मी तुझे काय वाईट केले आहे, तू मला विनाकारण मारीत आहेस. शांतचित्त असणारे लोक इतरांना क्षमा करतात व क्षमा करणारे लोकच विष्णूंना प्रिय होतात. तू आजपर्यंत लुटालूट व चोरी करून तुझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला आहेस. मात्र जीवनाच्या अंतिम समयी यापैकी कोणीही तुझ्या सोबत येणार आहे का? अथवा तुझ्या पापात तुझ्या कुटुंबातील कोणीतरी सहभागी होणार आहेत का? अंतिम समयी तुला एकट्यालाच जावे लागणार आहे व तुझी बरी वाईट कर्मेच तुझ्यासोबत राहणार आहेत.
ऋषी उत्तंकाचे हे बोलणे ऐकून गुलीक आपली पापे आठवून घाबरून गेला. तो उत्तंकाला म्हणाला, “हे महामुनी मागील जन्मी मी पापे केली असतील म्हणूनच मी या जन्मी सुद्धा दरोडेखोर झालो व आताही आजपर्यंत मी अनेक अधार्मिक कृत्ये व पापे केली आहेत; परंतु आपल्या भेटीने व आपल्या उपदेशामुळे मला त्याची जाणीव झाली आहे. आता माझे पुढे काय होईल याची मला भीती वाटत आहे. ही सगळी पापे फेडण्यासाठी मला किती जन्म लागतील? अशा प्रकारे पश्चाताप दग्ध व अंतर्दाहामुळे तो मंदिरातच मरून पडला. अंतिम क्षणी भगवान विष्णूंच्या चरणाशी देहत्याग झाल्याने तसेच उत्तंक ऋषीने केलेल्या उपदेशामुळे त्याची पापे नष्ट झाली.
उत्तंक ऋषींनी त्याची अवस्था पाहून त्याचे अंगावर विष्णूचे चरणोदक शिंपडले. त्यामुळे त्याची उरलेली पापे नष्ट झाली व तो मुक्त झाला. त्याच्या मुक्त झालेल्या आत्म्याने उत्तंकानेच केलेल्या उपदेशामुळे व कृपेमुळेच मिळालेल्या मुक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
महामुनी उत्तंक पुढे अनेक काळ श्रीहरीच्या ध्यानात व स्तुतीतच मग्न राहिले. यामुळे विष्णूंनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन देऊन तुला कोणतीही गोष्ट असाध्य असणार नाही, असा वर दिला; परंतु उत्तंकाने त्यांना जन्मोजन्मी आपली भक्तीच राहावी अशी इच्छा व्यक्त केली. प्रभूंनी त्यांना आराधनेसाठी नरनारायणाच्या आश्रमात जाण्याची आज्ञा केली व तेथेच तुम्हास मुक्ती मिळेल असा आशीर्वाद दिला. त्याप्रमाणे उत्तंक नरनारायणाच्या आश्रमात जाऊन आराधना करू लागले. त्यांच्या कठोर तपामुळे त्यांना विष्णुपद प्राप्त झाले. असा उल्लेख नारद पुराणात आहे.