RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षण वर्गाची उत्क्रांती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासूनच शिस्त, शारीरिक बळकटी आणि बौद्धिक घडण यासाठी प्रशिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले. काळानुसार या रचनेत बदल होत गेले. अधिक सुव्यवस्थित प्रशिक्षण प्रक्रिया विकसित करण्यात आली. या प्रशिक्षणातून तयार होणारे स्वयंसेवक संघटनेच्या विविध जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडण्यासाठी तयार होतात.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना राष्ट्रीय भावनेतून देशवासीयांचे संघटन घडवताना प्रशिक्षणाला विशेष महत्त्व देते. संघाच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळातच “संघ शिक्षा वर्ग” सुरू करण्यात आले. त्या काळात हा प्रशिक्षण अभ्यासक्रम तीन टप्प्यांचा होता. प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष. प्रथम आणि द्वितीय वर्षाचे वर्ग देशातील विविध प्रांतांमध्ये आयोजित केले जात असत, तर तृतीय वर्षाचा वर्ग संपूर्ण देशातून एकत्रितपणे केवळ नागपूर येथे घेतला जात असे. दरवर्षी उन्हाळ्यात साधारण एक महिन्याच्या कालावधीत हे वर्ग होत असत. या प्रशिक्षणात स्वयंसेवकांना संघकार्याचे सखोल आणि समग्र प्रशिक्षण दिले जात असे. या प्रक्रियेतून गेल्या शंभर वर्षांमध्ये लाखो स्वयंसेवक तयार होऊन देशभरात संघकार्यात सक्रिय झाले आहेत. काळानुसार संघाच्या रचना आणि प्रशिक्षण पद्धतींमध्ये बदल होत गेले. त्यानुसार या वर्गांची रचनाही सुधारित करण्यात आली.



सध्या प्रारंभी तीन दिवसांचा प्राथमिक परिचय वर्ग आणि त्यानंतर सात दिवसांचा प्राथमिक वर्ग घेतला जातो. हे दोन्ही वर्ग पूर्ण केलेल्या निवडक स्वयंसेवकांसाठी पुढील टप्प्यात कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष असे प्रशिक्षण उपलब्ध असते. प्रारंभिक, प्राथमिक आणि कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग प्रथम वर्ष हे बहुतेक प्रांत स्तरावर आयोजित केले जातात. हे साधारण २१ दिवसांचे असतात आणि त्यामध्ये स्वयंसेवकांना शारीरिक तसेच बौद्धिक प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग द्वितीय वर्ष मात्र पूर्वीप्रमाणेच नागपूर येथे घेतले जाते. या संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रियेतून तयार झालेला स्वयंसेवक संघाच्या विविध जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी सक्षम आणि तयार होतो.


दरवर्षी नागपूरमध्ये होणारा कार्यकर्ता विकास वर्ग हा संघप्रेमींसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरतो. काही अपवाद वगळता हा वर्ग नियमितपणे दरवर्षी आयोजित केला जातो. १९४८ आणि १९७५ मधील संघबंदी तसेच कोरोना काळात हा वर्ग होऊ शकला नाही. १९७३ मध्ये संघ शिक्षा वर्ग अंतिम टप्प्यात असतानाच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे निधन झाले होते. तसेच २००६ साली हा वर्ग सुरू असतानाच नागपूर येथील संघ मुख्यालयावर दहशतवाद्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटनाही घडली होती. पूर्वी कोणताही तरुण, मध्यमवयीन किंवा ज्येष्ठ स्वयंसेवक संघ शिक्षा वर्ग करू शकत असे. मात्र आता १५ ते ४० वयोगटातील स्वयंसेवकांसाठीच हा वर्ग अधिकृतपणे मान्य केला जातो. तरीही चाळिशीपुढील इच्छुक स्वयंसेवकांना ६५ वर्षांपर्यंत या वर्गात सहभागी होता येते. अशा ज्येष्ठ स्वयंसेवकांसाठी दर दोन वर्षांनी दिवाळीनंतर हिवाळ्यात स्वतंत्र वर्ग आयोजित केला जातो. ज्येष्ठ स्वयंसेवकांचा द्वितीय वर्षाचा वर्ग देशभरात फक्त नागपूर येथेच घेतला जातो. या वर्षीचा कार्यकर्ता विकास प्रशिक्षण वर्ग (द्वितीय वर्ष) नेहमीप्रमाणे नागपूर येथेच आयोजित करण्यात आला होता. ११ मे २०२६ पासून डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात सुरू झालेल्या या वर्गात देशभरातून ८३२ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. या वर्गाचे सर्वाधिकारी म्हणून संघाचे पंजाब क्षेत्र अधिकारी सरदार महेंद्रसिंग माग्गो यांनी जबाबदारी सांभाळली.



तीन आठवडे चाललेल्या या प्रशिक्षणात शारीरिक शिक्षणासोबतच बौद्धिक उद्बोधनावरही भर देण्यात आला. संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मांडलेल्या “पंचपरिवर्तन” संकल्पनेच्या अंमलबजावणीवर विशेष मार्गदर्शन करण्यात आले तसेच त्यावर सविस्तर चर्चा झाली. या वर्गात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्ताजी होसबळे, सहसरकार्यवाह अतुल लिमये, अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. मनमोहन वैद्य, माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी तसेच पश्चिम क्षेत्र प्रचारक सुमंत आमशेकर यांसह संघाच्या विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यकर्ता विकास प्रशिक्षण वर्ग द्वितीय वर्षाचा समारोप गुरुवार दि. ४ जून २०२६ रोजी रेशीमबाग मैदानावर पार पडला. यावेळी प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांनी शारीरिक प्रात्यक्षिके सादर केली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ख्यातनाम उद्योजक पद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला हे उपस्थित होते. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे देखील कार्यक्रमात उपस्थित होते. जगाला एका नव्या मार्गाची गरज आहे. तो मार्ग फक्त भारतच दाखवू शकतो असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना केले.



यासाठी वेळ आली आहे, मात्र ही वेळ आपोआप साधता येणार नाही. त्यासाठी तयार राहावे लागेल याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सध्याच्या अमृतकाळात भारत विकसित राष्ट्र होण्याकडे वाटचाल करीत आहे. हा काळ भारतीय युवकांसाठी अभूतपूर्व संधी घेऊन आला आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेत देशाच्या सर्वांगीण विकासात युवकांनी मोलाचे योगदान द्यावे असे आवाहन उद्योजक पद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला यांनी यावेळी बोलताना केले. गेल्या दहा वर्षांत भारताने अनेक क्षेत्रात शतकभराची प्रगती साधल्याने आज संपूर्ण जग भारताकडे आशेने आणि विश्वासाने पाहत आहे. याकडे लक्ष वेधत बिर्ला म्हणाले की, विविध आंतरराष्ट्रीय तज्ज्ञही भारताच्या विकासाची दखल घेत असून येत्या काळात विकसित भारत जगासमोर आदर्श निर्माण करू शकेल. युवकांनी आता जे काही करायचे ते सर्व काही देशासाठीच करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रशिक्षण वर्ग काल रात्री आटोपल्यावर आज प्रशिक्षणार्थी स्वयंसेवक आपापल्या गावी रवाना होत असलेले दिसून आले


___अविनाश पाठक
Comments
Add Comment

China Taiwan : तैवानची कोंडी

चीनच्या सततच्या गस्तीमुळे तैवानच्या लष्कराला २४ तास हाय-अलर्टवर राहावे लागते. परिणामी त्यांच्या सैनिकांमध्ये

मोशी : निष्काळजीपणाचे बळी

मोशी कचरा डेपोत घडलेली प्रशासकीय हलगर्जी आणि भ्रष्टाचाराची भीषण परिणती आठ निष्पाप कामगारांच्या मृत्यूच्या

Cricket Update : निराशाजनक पर्व

कर्णधार श्रेयस अय्यरसाठी हे अपयश एका अग्निपरीक्षेसारखे आहे. आगामी झिम्बाब्वे मालिकेपूर्वी भारतीय संघाला केवळ

Development vs Environment : विकास, की विकासाचा ऱ्हास?

‘प्रजा’ संस्थेच्या २०२६ च्या अहवालातून मुंबईतील कचरा, प्रदूषण, वाहतूक आणि इतर नागरी समस्यांचे गंभीर चित्र समोर

Konkan Folk Art : कोकणातल्या लोककलेला राजाश्रय

सिंधुदुर्गातील दशावतार, रत्नागिरी जिल्ह्यातील नमन, जाखडी, रायगड जिल्ह्यातील आदिवासी तारफा नृत्य या सर्वांची

लँडमार्क करार

भारताच्या बदलत्या परराष्ट्र धोरणाचा आणि इंडो-पॅसिफिकमधील वाढत्या रणनीतिक भूमिकेचा ठसा उमटवत पंतप्रधान