'उबाठा'चे उमेदवार बाळ माने यांची माघार; कोकण विधानपरिषदेची निवडणूक होणार बिनविरोध
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी अवघे दोन तास शिल्लक राहिलेले असतानाच कोकणच्या राजकारणात मोठा 'ट्विस्ट' पाहायला मिळाला. महाविकास आघाडीचे (उबाठा) अधिकृत उमेदवार बाळ माने यांनी शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे भाजप संपर्क प्रमुख नितेश राणे यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे हा राजकीय चमत्कार घडला असून, बाळ माने थेट नितेश राणे यांच्यासोबतच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या. माने यांच्या माघारीमुळे आता कोकण विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, हा उबाठा गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी गुरुवारी ज्येष्ठ नेते शरद ...
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी दुपारी स्वतः नितेश राणे हे बाळ माने यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. तेथे माने यांनी अधिकृतपणे माघार घेतल्याचे जाहीर केले. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर बाळ माने यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफुशीवर नाराजी व्यक्त केली. माने म्हणाले, "उमेदवारी अर्ज भरताना सूचक म्हणून मला महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सह्या मिळाल्या नाहीत. मविआतील घटक पक्षांकडून मला कोणतीही राजकीय साथ लाभली नाही. पक्षाचे मतदार असलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींपैकी काही मंडळी चक्क तीर्थयात्रेला निघून गेली आहेत, त्यामुळे मला मतदारच भेटत नव्हते. अशा परिस्थितीत मी काय करणार? मला या निवडणुकीत होणारा संभाव्य घोडेबाजार टाळायचा होता, म्हणूनच मी नाईलाजाने या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे."
माने यांनी देवाभाऊंच्या शब्दाचा मान राखला - नितेश राणे
या संपूर्ण घडामोडींवर बोलताना मंत्री नितेश राणे यांनी बाळ माने यांच्या भूमिकेचे स्वागत केले. ते म्हणाले, "मी येथे महायुतीचा एक अधिकृत प्रतिनिधी आणि कार्यकर्ता म्हणून आलो आहे. बाळ माने हे माजी आमदार असून अनुभवी नेते आहेत, त्यांना बरे-वाईट सर्व समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने काम करत आहेत, ते पाहता राज्याला पुढे नेण्यासाठी त्यांच्याशिवाय पर्याय नाही हे आता सर्वांना पटू लागले आहे. माने यांनी आमच्या ज्येष्ठ नेत्यांच्या शब्दाचा मान ठेवला आणि मविआतील परिस्थिती ओळखून हा अत्यंत समजूतदार निर्णय घेतला," असे राणे यांनी स्पष्ट केले.