जळगाव : जळगाव (Jalgaon) शहरातील रामानंदनगर परिसरात एक धक्कादायक अपघात घडला असून, एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवत तब्बल ९ जणांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पून्हा एकदा पोर्श कार अपघात प्रकरण डोळ्यासमोर उभे राहिले आहे. (Car Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी गिरणा टाकी ते चर्च या मार्गावर हा अपघात झाला. अल्पवयीन मुलगा कार चालवत असताना अचानक त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कारने रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी आणि दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. अपघात इतका गंभीर होता की काही जण रस्त्यावर दूरपर्यंत फेकले गेले.
मालाडमध्ये बेस्ट बसचा अपघात; अनेक वाहनांना धडक, महामार्गावर वाहतूक कोंडी
मुंबई : मुंबईतील मालाड (Malad Accident) पूर्व परिसरात गुरुवारी सकाळी बेस्ट बसच्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. पुष्पा पार्कजवळ वेस्टर्न ...
या घटनेत दोन दाम्पत्यांसह एका तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एका इलेक्ट्रिक दुचाकीलाही कारची धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वाराच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. जखमींना मदत करण्यासाठी स्थानिकांनी धाव घेतली. दरम्यान, संतप्त नागरिकांचा रोष पाहून कार चालवणारा अल्पवयीन मुलगा वाहन घटनास्थळीच सोडून पळून गेल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेमुळे रामानंदनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. अल्पवयीन मुलगा कोण आहे, त्याच्याकडे कार कशी आली आणि वाहन चालवण्याची परवानगी कोणी दिली, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.