Wednesday, June 3, 2026

Navnath Ban : ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली, आश्वासनपूर्ती तर महायुतीने केली : नवनाथ बन यांचा हल्लाबोल

Navnath Ban : ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली, आश्वासनपूर्ती तर महायुतीने केली : नवनाथ बन यांचा हल्लाबोल

- कर्जमाफी ते विधान परिषद निवडणूक; नवनाथ बन यांची ठाकरे गटावर जहरी टीका

मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भाजप नेते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीचा लाभ अनेक पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली, असा आरोप त्यांनी केला.

नवनाथ बन (Navnath Ban) म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिले. शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांना अडचणीत आणण्याचे काम त्या सरकारने केले. याउलट महायुती सरकारने कोणतीही निवडणूक समोर नसतानाही दिलेली आश्वासने पूर्ण करण्यावर भर दिला आहे.

ते पुढे म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत महायुती सरकारने कर्जमाफीसह विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. फसव्या योजना भाजप किंवा महायुतीच्या नसून त्या ठाकरे आणि राऊत यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या गेल्या होत्या, अशी टीकाही त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असून दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Navnath Ban)

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा विजयाचा दावा :

आगामी विधान परिषद निवडणुकीबाबत बोलताना नवनाथ बन (Navnath Ban) यांनी महायुतीतील सर्व घटक पक्ष एकजुटीने मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले. विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीतही समन्वयाने लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महायुती राज्यातील सर्व १७ जागांवर विजय मिळवेल, असा ठाम विश्वास व्यक्त करत बन म्हणाले की, राज्यातील जनतेचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींचा पाठिंबा महायुतीला मिळत आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतही महायुती विजयाची हॅट्ट्रिक करेल आणि विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहील. (Navnath Ban)

राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले असताना शेतकरी कर्जमाफी आणि विधान परिषद निवडणुकीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. आगामी काळात या विषयावर राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Navnath Ban)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >