Sunday, August 23, 2026

Mahayuti : महायुतीमधील बंडखोरांनी तातडीने अर्ज मागे घ्यावेत

Mahayuti : महायुतीमधील बंडखोरांनी तातडीने अर्ज मागे घ्यावेत

रवींद्र चव्हाणांचे आवाहन; एकत्र पत्रकार परिषद घेत महायुतीने जाहीर केली अधिकृत उमेदवारांची यादी

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद (Vidhan Parishad) निवडणुकीत (Elections) बंडखोरांनी डोकेदुखी वाढवल्यामुळे महायुतीने अखेर अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या व्यतिरिक्त अर्ज दाखल केलेल्या सर्वांनी माघार घ्यावी, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी बुधवारी केले. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेना उपनेते राहुल शेवाळे आदी उपस्थित होते.

जागावाटपाच्या वेळी कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये काही जागांवरून नाराजी असणे किंवा उमेदवारीची तीव्र इच्छा असणे स्वाभाविक आहे; मात्र अशा बंडखोरीमुळे महायुतीच्या एकजुटीला धक्का पोहोचू नये, यासाठी वरिष्ठ पातळीवरून सर्व बंडखोर नेत्यांशी वैयक्तिक संवाद साधून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

या निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षांमध्ये झालेल्या अंतिम तडजोडीनुसार भाजप (BJP) ११ जागांवर, शिवसेना (Shivsena) ४ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) २ जागांवर निवडणूक (Election) लढवत आहे. पक्षाच्या आदेशानुसारच सर्व उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले असून, महायुती सर्व १७ जागांवर पूर्ण ताकतीने आणि समन्वयाने लढणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. काही मतदारसंघांमध्ये एकाच जागेवर महायुतीमधील दोन वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी अर्ज भरल्यामुळे निर्माण झालेला गोंधळ ४ जूनच्या अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीपूर्वी पूर्णपणे सोडवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते या संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून, स्थानिक पातळीवरील बंडखोरांना शांत करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांमार्फत चर्चा केली जात आहे.

चव्हाण म्हणाले, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि बंडखोर उमेदवारांना विनंती आहे की, ही निवडणूक आगामी काळातील राजकीय घडामोडींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने सर्वांनी अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. महायुतीमधील कोणतीही अंतर्गत बंडखोरी मतदानाच्या निकालावर परिणाम करणार नाही आणि सर्व जागांवर महायुतीचाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा