Saturday, June 13, 2026

Sunil Tatkare : महायुतीमधील बंडखोरांची नाराजी समन्वयाने दूर करू

Sunil Tatkare : महायुतीमधील बंडखोरांची नाराजी समन्वयाने दूर करू

 सुनील तटकरे; ४ जूनपर्यंत सकारात्मक तोडगा निघेल

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे चित्र समोर आले. या पार्श्वभूमीवर बंडखोरी मिटवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून समन्वयाने तोडगा काढू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी दिली. लोकशाहीत आणि युती-आघाडीच्या राजकारणात जागावाटपाच्या वेळी कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी असणे स्वाभाविक आहे, परंतु ४ जूनच्या अर्ज माघारीच्या मुदतीपर्यंत या सर्व घडामोडींवर सकारात्मक तोडगा काढला जाईल, असा विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील जागावाटपाचे सूत्र आधीच ठरले असून, त्यानुसार भाजप सर्वाधिक ११ जागांवर, शिवसेना ४ तर राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर निवडणूक लढवत आहे. तटकरे यांनी स्पष्ट केले की, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि पुणे या राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या दोन्ही जागांवर पक्षाने अधिकृत उमेदवार दिले असून ते पूर्ण ताकतीने निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, नाशिक, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी किंवा त्यांच्या समर्थकांनी बंडखोरीचे निशाण फडकावल्याने महायुतीसमोर पेच निर्माण झाला आहे. या बंडखोरीमुळे महायुतीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली असली, तरी तिन्ही पक्षांचे सर्वोच्च नेतृत्व म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकत्र बसून यावर मार्ग काढतील, असे तटकरे यांनी सांगितले.

अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ४ जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे, त्यामुळे तोपर्यंत बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्यासाठी महायुतीकडे पुरेसा वेळ उपलब्ध आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. स्थानिक पातळीवरील नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींमध्ये असलेली नाराजी दूर करून अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी सर्वांना उभे करणे हेच सध्या आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. महायुतीमधील कोणताही अंतर्गत वाद निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणार नाही आणि आगामी काळात सर्व बंडखोर थंड होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >