छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५३ व्या वर्धापन दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर ५ आणि ६ जून रोजी भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आहे आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि अभ्यासकांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या सोहळ्यानिमित्त प्रशासन सज्ज झाले आहे.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले असून अनेक स्वयंसेवक आणि समित्यांचा यात सहभाग आहे.
या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड परिसरात विशेष तयारी करण्यात आली आहे. गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, वैद्यकीय सेवा, सुरक्षा यंत्रणा तसेच मार्गदर्शन केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गडावर होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व तयारी पूर्णत्वाकडे नेली आहे.
पहिल्या दिवशी ५ जून रोजी पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर रायगड चढाई, गडपूजन, पारंपरिक युद्धकलेची प्रात्यक्षिके, शाहिरी कार्यक्रम, गोंधळ आणि भजन-कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दुसऱ्या दिवशी ६ जून रोजी मुख्य राज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे. ध्वजारोहण, शिवछत्रपतींच्या पालखीचे आगमन, उत्सवमूर्तीचा अभिषेक, सुवर्णमुद्रांचा अभिषेक आणि पालखी सोहळा हे कार्यक्रम यावेळी पार पडतील. तसेच शिवभक्तांना संबोधित करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी अभिवादन करून सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे. स्वराज्याच्या इतिहासाला उजाळा देणारा हा सोहळा यंदाही महाराष्ट्रातील शिवप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.