मुंबई : राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि असंतोष चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या पक्षांतर्गत विरोधकांनी आता त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. सपकाळ यांच्या निर्णय प्रक्रियेला आणि एकतर्फी कारभाराला कंटाळलेला हा नाराजांचा गट आता दिल्ली दरबारी पोहोचणार असून, येत्या ८ जून रोजी काँग्रेस हायकमांडची भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी लावून धरणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धतीविषयी तीव्र आक्षेप असलेला हा नाराज गट ८ जून रोजी नवी दिल्लीत दाखल होणार आहे. तिथे ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राज्यातील स्थितीची कल्पना देणार आहेत. विशेष म्हणजे, हायकमांडकडे जाणाऱ्या या शिष्टमंडळात राज्यातील काँग्रेसचे ४ ते ५ विद्यमान आमदार आणि अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
Mumbai : मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ मधील कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्जास तसेच राज्य ...
काँग्रेसमधील या अंतर्गत बंडाचे आणि नाराजीचे मुख्य कारण पक्षात काही दिवसांपूर्वी राबवण्यात आलेले 'संघटन सृजन अभियान' हे ठरले आहे. या अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात काँग्रेसच्या नवीन शहराध्यक्षांच्या आणि जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र, या निवडी करताना स्थानिक पातळीवरील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि विद्यमान आमदारांना पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले, त्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतले गेले नाही, असा आरोप या नाराज गटाकडून केला जात आहे. सपकाळ यांनी या निवडींमध्ये चुकीच्या पद्धती अवलंबल्यामुळेच पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक नेतृत्वात मोठी खदखद निर्माण झाली आहे.
पडद्यामागे कोण ?
सध्या ही 'प्रदेशाध्यक्ष हटाव' मोहीम काही जिल्हास्तरीय पदाधिकारी आणि आमदार चालवत असल्याचे दिसत असले, तरी या पडद्यामागे राज्यातील काँग्रेसचे काही अत्यंत वजनदार आणि बडे नेते असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. वरिष्ठ नेत्यांच्या सुप्त पाठिंब्याशिवाय दिल्ली हायकमांडला परस्पर भेटणे शक्य नसल्याने, या मोहिमेमागे मोठी शक्ती असल्याचे बोलले जात आहे. विधान परिषद निवडणुकीच्या अत्यंत महत्त्वाच्या क्षणी संघटनात्मक पातळीवरील हा वाद चव्हाट्यावर आल्याने काँग्रेस बॅकफूटवर आली आहे. आता यावर दिल्लीतील पक्षश्रेष्ठी काय तोडगा काढतात आणि ८ जूनच्या बैठकीत हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षपदाबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





