तुरुंगाबाहेर येताच धक्कादायक खुलासा
या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण होतो की, जर बापाने खून केलाच नव्हता, तर त्याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली का दिली? २१ दिवस तुरुंगात काढल्यानंतर बाहेर आलेल्या बापूराव काळमेकर यांनी यामागचे जे कारण सांगितले, ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्र चक्रावून गेला आहे. "माझी मुलगी एकापाठोपाठ एक तब्बल तीन वेळा घरातून पळून गेली होती. तिच्या या वागण्यामुळे समाजात आमची प्रचंड बदनामी झाली होती आणि आम्ही वैतागलो होतो. जेव्हा पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले, तेव्हा पळून गेलेल्या मुलीच्या रागामुळे आणि काय करावे हे न सुचल्यामुळे मी थेट हत्येचा गुन्हा अंगावर घेतला," असे बापूराव यांनी सांगितले. विशेष म्हणजे, यासाठी पोलिसांचा कोणताही दबाव किंवा आमिष नव्हते, तर केवळ मुलीच्या कृत्याबद्दलच्या संतापातून त्यांनी ही दिशाभूल करणारी कबुली दिली होती.
जंगलात सापडला अर्धवट जळालेला छिन्नविछिन्न मृतदेह
या प्रकरणाची सुरुवात अत्यंत भयावह झाली होती. बुलढाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा जंगल परिसरात एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळला होता. मारेकऱ्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे शीर धडावेगळे केले होते आणि मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली. पोलिसांनी जंग जंग पछाडल्यानंतर त्यांना शेजारच्या मध्य प्रदेशातील खकनार पोलीस ठाण्यात २५ वर्षीय शिवानी काळमेकर नावाच्या तरुणीची बेपत्ता असल्याची तक्रार मिळून आली. तिथूनच पोलिसांच्या तपासाची सुई काळमेकर कुटुंबाकडे फिरली.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून ...
प्रेमप्रकरण, काठीने वार आणि दुचाकीवरून मृतदेहाची विल्हेवाट
तपासा दरम्यान पोलिसांनी जेव्हा बापूराव काळमेकर यांना खाक्या दाखवला, तेव्हा त्यांनी रचलेली काल्पनिक कथा पोलिसांना खरी वाटली. शिवानीचे लग्न अमरावतीच्या एका तरुणाशी झाले असूनही तिचे तिच्या चुलत भावाशी प्रेमसंबंध होते, असा दावा बापाने केला. याच रागातून २५ अप्रैल रोजी तिच्या डोक्यात काठी मारून तिचा जीव घेतला आणि मुलाच्या मदतीने दुचाकीवरून मृतदेह बुलढाण्याच्या जंगलात आणून जाळला, अशी कबुली बापाने दिली. पोलिसांनी कसलीही शहानिशा न करता, डीएनए (DNA) चाचणी किंवा पुराव्यांची तपासणी न करता या केवळ तोंडी कबुलीच्या आधारावर बाप-लेकाला तात्काळ गजाआड केले. केवळ संशयाच्या आणि घाईघाईत घेतलेल्या कबुलीच्या आधारावर निष्पाप नागरिकांना तुरुंगात पाठवल्याचे उघड होताच पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) ठाणेदार सुनील अंबुलकर, जळगाव जामोदचे ठाणेदार नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांच्यासह अन्य ३ कर्मचाऱ्यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात (हेड क्वार्टर) रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांच्या या निष्काळजीपणामुळे खाकी वर्दीच्या कार्यपद्धतीवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
बाप-लेक सुटले, पण 'तो' मृतदेह नेमका कुणाचा ? रहस्य अजूनही कायम!
न्यायालयीन प्रक्रियेनंतर अखेर बापूराव काळमेकर आणि त्यांच्या मुलाची या प्रकरणातून सन्मानपूर्वक सुटका झाली आहे. शिवानी जिवंत परतल्याने काळमेकर कुटुंबावरील हत्येचा कलंक पुसला गेला असला, तरी राजुरा जंगलात सापडलेला तो छिन्नविछिन्न मृतदेह नेमका कोणाचा होता? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. पोलिसांनी एका केसच्या घाईत मुख्य गुन्हेगाराला मोकळे सोडले असून, आता त्या मृत तरुणीची ओळख पटवणे आणि खऱ्या मारेकऱ्याला शोधणे हे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान बनले आहे.