Sunday, May 31, 2026

Sachin Tendulkar : वैभववर दबाव टाकू नका; टीम इंडियातील निवडीवर सचिन तेंडुलकरचे स्पष्ट मत, दिला मोठा सल्ला...

Sachin Tendulkar : वैभववर दबाव टाकू नका; टीम इंडियातील निवडीवर सचिन तेंडुलकरचे स्पष्ट मत, दिला मोठा सल्ला...

Mumbai : राजस्थान रॉयल्सचा 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आयपीएल 2026 मधील आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे देशभर चर्चेचा विषय झाला आहे. सलग दोन हंगामात दमदार कामगिरी करत त्याने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे आता त्याला लवकरच भारतीय संघात संधी द्यावी, अशी मागणी जोर धरत असताना भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने याबाबत महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. सचिनचे विधान सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय म्हणाला सचिन तेंडुलकर ?

सचिन तेंडुलकरने वैभवच्या नैसर्गिक खेळाचे कौतुक केले. वैभववर अनावश्यक दबाव टाकू नका. तो सध्या जसा खेळतो आहे, तसाच खेळत राहणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्या खेळात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. तो स्वतःवर विश्वास ठेवतो आणि मैदानात नेमके काय करायचे हे त्याला चांगलंच माहित आहे; असे सचिनने सांगितले.

डोक्यात खूप गोष्टी भरल्या तर समस्या सुरू होतील...

वैभवच्या स्वभावावर बोलताना सचिनने प्रशिक्षक आणि क्रिकेट तज्ज्ञांनाही अप्रत्यक्ष इशारा दिला. जर त्याच्या डोक्यात आतापासूनच खूप गोष्टी भरल्या गेल्या आणि सतत सूचना दिल्या गेल्या, तर समस्या निर्माण होईल. त्याला त्याचा नैसर्गिक खेळ खेळू द्यावा. सचिनने पुढे सांगितले की वैभवकडे केवळ ताकदीने फटके मारण्याची क्षमता नाही, तर मनगटाच्या जोरावर चेंडूला दिशा देण्याचीही कला आहे. चेंडूचा टप्पा आणि दिशा तो अतिशय लवकर ओळखतो, ही त्याची मोठी ताकद आहे, असं सचिनने सांगितले.

टीम इंडियातील संधी बाबत काय म्हणाले ?

वैभवला भारतीय संघात तातडीने स्थान द्यावे का, या प्रश्नावर सचिनने मध्यम भूमिका घेतली. मी निवड समितीचा सदस्य नाही आहे. त्यामुळे त्याच्या निवडीबद्दल थेट भाष्य करणे मला योग्य वाटत नाही. मात्र. प्रत्येक क्रिकेटप्रेमीप्रमाणे मला ही वाटते की तो देशासाठी खेळावा...सचिनने शेवटी वैभवसारख्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे सांगितले. अशा प्रतिभेला योग्य पाठिंबा मिळायला हवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या क्रिकेटचा आनंद घ्या त्याच्यावर अपेक्षांचा दबाव टाकू नका.

आयपीएलमध्ये वैभवची दमदार कामगिरी

यंदाच्या हंगामात वैभवने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्षय वेधून घेतले आहे. अवघ्या 15 व्या वर्षी आयपीएलमध्ये गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत वैभव सूर्यवंशीने अनेक दिग्गजांचे विक्रम मोडले आहेत. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे तो भारतीय क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार मानला जात आहे. मात्र, सचिनच्या मते त्याच्या यशाचा खरा मंत्र म्हणजे त्याचा नैसर्गिक खेळ आहे. त्याच्यावर अपेक्षांचा दबाव टाकू नका असं सचिन यावेळी म्हणाला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >