कल्याण : कल्याण पूर्व (Kalyan East) परिसरात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा संतप्त सवाल निर्माण करणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यावर बसून मद्यपान करणाऱ्या काही टवाळखोरांनी एका हॉटेल चालकावर प्राणघातक हल्ला चढवल्याची घटना घडली आहे. शुल्लक कारणावरून झालेल्या या वादाचे पर्यवसान थेट तुफान हाणामारीत झाले. या संपूर्ण मारहाणीचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नेमकं काय घडलं?
भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात दुचाकीच्या किरकोळ धक्क्यावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चव्हाण ...
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेकडील गजबजलेल्या मेट्रो मॉल परिसरात रात्रीच्या सुमारास काही मद्यधुंद तरुण रस्त्याच्या कडेला बसून दारू पिऊन धिंगाणा घालत होते. याच दरम्यान, या तळीरामांनी जवळच असलेल्या एका हॉटेल चालकाकडे आधी कोल्ड्रिंक मागितले आणि त्यानंतर थंड पाण्याच्या बाटलीची मागणी केली. परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे हॉटेल चालकाने त्यांना थंड पाण्याची बाटली देण्यास असमर्थता दर्शवली. अवघा इतकाच नकार ऐकताच नशेत चुर असलेल्या त्या गुंडांचा पारा चढला. त्यांनी आधी हॉटेल चालकाला अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता थेट त्याच्या अंगावर धावून जात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
मारहाणीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
हा सगळा प्रकार सुरू असताना हॉटेल परिसरात आणि रस्त्यावर एकच खळबळ उडाली. हॉटेल चालक स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र मद्यधुंद तरुण त्याच्यावर तुटून पडले होते. हा संपूर्ण थरकाप उडवणारा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अचूक कैद झाला आहे. या व्हायरल फुटेजमध्ये नशेखोरांची गुंडगिरी स्पष्टपणे दिसून येत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, या विकृत प्रवृत्तीच्या लोकांवर आणि गुंडांवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
मेट्रो मॉल परिसरात नशेखोरांचा उच्छाद
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो मॉल, नेतीबली आणि आनंद नगर हा परिसर आता रात्रीच्या वेळी मद्यपी आणि नशेखोरांचा अड्डा बनला आहे. रात्री अंधार पडताच सार्वजनिक ठिकाणी उघडपणे दारू पिणे, येणाऱ्या-जाणाऱ्यांवर शेरेबाजी करणे आणि गोंधळ घालणे अशा घटना रोजच्याच झाल्या आहेत. यामुळे या भागातून रात्रीच्या वेळी प्रवास करणे सामान्य नागरिकांसाठी, विशेषतः महिला, तरुण मुली आणि लहान मुलांसाठी अत्यंत असुरक्षित आणि भीतीदायक बनले आहे. या भागात नेहमीच दहशतीचे वातावरण असते, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे.
पोलिसांकडे रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी
विशेष म्हणजे, या परिसरात गुन्हेगारीची ही पहिलीच घटना नाही. काही दिवसांपूर्वीच याच भागात नशेत धुंद असलेल्या काही टोळ्यांनी अनेक घरांवर दगडफेक करत वाहनांची आणि घरांची तोडफोड केली होती. एकापाठोपाठ एक घडणाऱ्या अशा गुन्हेगारी कृत्यांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. वारंवार तक्रार करूनही ठोस कारवाई होत नसल्याने, आता पोलिसांनी या परिसरात रात्रीची कोंबिंग ऑपरेशन आणि गस्त (Patrolling) तात्काळ वाढवावी, तसेच रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्या नशेखोरांना बेड्या ठोकून त्यांची योग्य ती गय करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.