Chhagan Bhujbal : छगन भुजबळ राज्यसभेत, पुतण्या राज्यात मंत्री?

जोरदार लॉबिंग सुरू; पडद्याआड घडामोडींना वेग, १ जूनला अर्ज भरण्याची अंतिम मुदत


मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरून राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू झाली आहे. या रिक्त जागेवर आपली वर्णी लागावी यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पडद्याआडून जोरदार लॉबिंग सुरू केल्याची विश्वासार्ह माहिती आहे. स्वतः दिल्लीत जातानाच आपल्या जागी पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठीही भुजबळ आग्रही असल्याने राष्ट्रवादीच्या गोटात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे.


छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली नसली, तरी पक्षांतर्गत पातळीवर त्यांनी यासाठी दबाव वाढवला आहे. भुजबळांना दिल्लीत पाठवून त्यांच्या जागी पुतण्या समीर भुजबळ यांना राज्यात मंत्री केल्यास पक्षात आणि विरोधकांकडून ‘घराणेशाही’चा आरोप होऊ शकतो, अशी भीती काही नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, भुजबळ समर्थकांनी या युक्तिवादाला पक्षातच जोरदार आव्हान दिले आहे.



पक्षातील घराणेशाहीच्या चर्चेवर भुजबळ समर्थक कमालीचे आक्रमक झाले आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर एका वरिष्ठ भुजबळ समर्थक नेत्याने पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वालाच थेट आरसा दाखवला आहे. "राज्यात अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री असताना सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर खासदार करण्यात आले होते. खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत. जर वरिष्ठ नेत्यांची मुलं-मुली आणि पत्नी सत्तेच्या पदांवर राहू शकतात, तर हेच सूत्र भुजबळांच्या बाबतीत का लागू केले जात नाही?" असा सवाल भुजबळ गटाकडून उपस्थित केला आहे. या अंतर्गत वादामुळे पक्षात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.



अजित पवारांनी व्यक्त केली होती नाराजी


-छगन भुजबळ यांनी गेल्या काही काळात घेतलेल्या आक्रमक राजकीय भूमिकांमुळे त्यांचे आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संबंध ताणले गेले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला छगन भुजबळ यांनी ओबीसींचे नेते म्हणून कडाडून विरोध केला होता.


-मात्र, भुजबळांच्या या टोकाच्या भूमिकेमुळे पक्षाच्या प्रतिमेला आणि मतांना फटका बसत असल्याची जाहीर नाराजी अजित पवारांनी पक्षाच्या बैठकीत बोलून दाखवली होती. "काही नेत्यांच्या विशिष्ट जातीवरील टोकाच्या भूमिकेमुळे पक्षाला किंमत मोजावी लागते," अशा शब्दांत अजित पवारांनी भुजबळांचे कान टोचले होते.


-या पार्श्वभूमीवर, भुजबळांना राज्याच्या राजकारणातून सन्मानपूर्वक दिल्लीत पाठवून राज्यातील ओबीसी मतदारांना आश्वस्त करणे आणि त्याच वेळी त्यांच्या जागी समीर भुजबळ यांना संधी देऊन भुजबळ गटाला शांत करणे, असा दुहेरी फॉर्म्युला सध्या चर्चिला जात आहे.


-आता या पडद्याआड सुरू असलेल्या घडामोडींवर सुनेत्रा पवार काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Parth Pawar : मुंढवा जमीन वादात न्यायालयाचा मोठा आदेश; पार्थ पवारांच्या कंपनीचा दस्त रद्द

पुणे : पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन प्रकरणात महत्त्वाचा न्यायालयीन निर्णय देण्यात आला असून, उपमुख्यमंत्री

Mhada: म्हाडातर्फे १३ जुलै रोजी १९ वा लोकशाही दिन साजरा होणार

मुंबई(Mumbai) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (Mhada) एकोणीसावा लोकशाही दिन सोमवार १३ जुलै २०२६

Government of Maharashtra : 'आपत्तीवर वॉर मोड'! पावसाळी संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सज्ज; मोशी, पालघरसह राज्यभर बचावकार्य वेगात

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या

Water Management : धरण ओव्हरफ्लो, तरी पाणीटंचाई कायम!

मुंबई(Mumbai) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांत पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातील

Ind vs Eng : लॉर्ड्सवर भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये ऐतिहासिक कसोटी सामना

लंडन: क्रिकेटचे सर्वात प्रतिष्ठित मैदान असलेल्या लॉर्ड्सवर शुक्रवारी पहिला महिला कसोटी सामना खेळला जाणार असून,

Lote MIDC : लोटे एमआयडीसीतील रसायन गळतीने खळबळ, एमपीसीबीकडून सहा कारखान्यांना उत्पादन बंदीची दिली नोटीस

खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, औद्योगिक वसाहतीतील एका