मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील ४ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकणातील पालघरमध्ये आणि मुंबईत हलका पाऊस, तर ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गातही मध्यम पावसाचा अंदाज असून या सर्व जिल्ह्यांमध्ये अद्याप कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. सोबतच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर नाशिक घाटमाथ्यावर हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडेल असा अंदाज आहे. अहिल्यानगर जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा वेग काहीसा समानच आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथा परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी २० ऑगस्ट रोजी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. मात्र ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकतं अशी शक्यता आहे. एकंदरच, राज्यात सध्यातरी पावसाचा जोर कमी झाला आहे व कोणत्याही प्रकारचे हाय अलर्ट जारी करण्यात आलेले नाहीत.