पाटणा : बिहारच्या बरह उपविभागातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आज पहाटेच्या सुमारास प्रसिद्ध अशा उमानाथ गंगा घाटावर (Umnath Ganga) प्रवाशांनी भरलेली एक बोट नदीच्या पात्रात उलटून मोठा अपघात झाला. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत दोघांचा बुडून मृत्यू झाला असून, पाच प्रवासी अद्यापही बेपत्ता आहेत. सुदैवाने, स्थानिक मच्छीमार आणि बचाव पथकाच्या सतर्कतेमुळे सात जणांना नदीच्या पुरातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण बरह परिसरात आणि मृतकांच्या नातेवाईकांमध्ये एकच आक्रोश पाहायला मिळत आहे.
नदीच्या मध्यभागी अचानक गेला तोल अन्...
कल्याण : कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या (Bakri Eid) पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा धार्मिक वाद उफाळून आला असून परिसरात तणावपूर्ण वातावरण ...
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे १४ प्रवाशांना घेऊन ही बोट दियारा क्षेत्राच्या दिशेने रवाना झाली होती. बोट घाटावरून काही अंतरावर गेली आणि गंगा नदीच्या मुख्य पात्रात पोहोचली असता, अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने किंवा अन्य कारणांमुळे बोटीचा तोल गेला. काही समजण्याच्या आतच प्रवाशांनी भरलेली बोट गंगा नदीत उलटली. बोट उलटताच पाण्यात पडलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी एकच टाहो फोडला. हा आरडाओरड ऐकून घाटावर उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी आणि नाविकांनी कोणतीही पर्वा न करता तात्काळ नदीत उड्या मारल्या आणि सात जणांचे प्राण वाचवले.
एनडीआरएफकडून गंगेच्या पात्रात कसून शोध
या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली. पूर विभागाच्या उपविभागीय अधिकारी (SDO) गरिमा लोहिया आणि एसडीपीओ (SDPO) रामकृष्ण यांनी तात्काळ आपल्या फौजफाट्यासह उमानाथ गंगा घाटावर धाव घेतली. प्रशासनाने तातडीने एनडीआरएफ (NDRF) आणि स्थानिक गोताखोरांच्या पथकाला पाचारण केले आहे. सध्या गंगेच्या वेगवान प्रवाहात बेपत्ता असलेल्या पाच जणांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन राबवले जात आहे. नदीच्या वेगवेगळ्या भागांत बोटींच्या साहाय्याने शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.
सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या अपघाताचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच उमानाथ घाटावर स्थानिक लोकांची आणि पीडितांच्या नातेवाईकांची प्रचंड गर्दी जमली आहे. पोलीस सध्या मृत घोषित केलेल्या दोन जणांची ओळख पटवण्याचे काम करत असून, वाचवलेल्या जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेमुळे नदी वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीत बसवले गेले होते का? प्रवाशांकडे लाईफ जॅकेटसारखी सुरक्षेची साधने उपलब्ध होती का? या सर्व बाजूंची प्रशासनाकडून कसून चौकशी केली जात असून दोषींवर कडक कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.