IPL 2026 :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) वेगवान गोलंदाज यश दयाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ च्या संपूर्ण हंगामात बाहेर राहिल्यानंतर आता त्याने आपल्या अनुपस्थितीबाबत मोठं वक्तव्य केले आहे. त्याच्या या वक्तव्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या मोसमातून बाहेर राहणं हा माझा वैयक्तिक निर्णय नव्हता, असं स्पष्ट सांगत दयालने आरसीबी व्यवस्थापनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी आरसीबीचे क्रिकेट संचालक मो बॉबट यांनी यश दयाल वैयक्तिक कारणांमुळे या मोसमात खेळणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र दयालने त्या दाव्यावर वेगळी भूमिका घेतल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
टॉक विथ मानवेंद्र या पॉडकास्टमध्ये बोलताना यश दयाल म्हणाला,जेव्हा मी टीव्हीवर संघाला खेळताना पाहतो, तेव्हा अनेकदा उठून बसावंसं वाटतं. कारण तो अजूनही माझाच संघ आहे. आरसीबीने मला संघातून काढलेलं नाही. त्यांनी मला रिटेन केलं आणि माझ्या जागी दुसरा खेळाडू घेतलाही नाही. याचा अर्थ त्यांना मी अजूनही महत्त्वाचा वाटतो. त्याने पुढे स्पष्ट केलं की या हंगामातून बाहेर राहणं हा माझा वैयक्तिक निर्णय नव्हता. कदाचित हे वक्तव्य वादग्रस्त ठरू शकतं, पण अंतिम निर्णय हा नेहमी व्यवस्थापनाचाच असतो. मला अजूनही माहिती नाही की आरसीबीने नेमकं कोणत्या कारणामुळे हा निर्णय घेतला. मला संघाची खूप आठवण येते. दयालने आरसीबी व्यवस्थापनाशी आपला संपर्क कायम असल्याचंही सांगितलं. मी डायरेक्टर, कोच आणि दिनेश कार्तिक यांच्याशी नियमित संवाद करत आहे. आमच्यात कोणतीही कम्युनिकेशन गॅप नाही. सर्व काही स्पष्ट आहे, असं तो म्हणाला.
दयालला आयपीएलमधून का बाहेर करण्यात आले होते ?
यश दयाल सध्या गंभीर कायदेशीर अडचणीत अडकलेला आहे. त्याच्यावर एका महिलेने लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. गाझियाबादमध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. याशिवाय जयपूरमध्ये त्याच्यावर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका अल्पवयीन मुलीला क्रिकेटमध्ये करिअर घडवून देण्याचं आमिष दाखवत दोन वर्ष अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पीडित मुलगी अत्याचार सुरू झाले तेव्हा केवळ १७ वर्षांची होती. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही प्रकरणांमुळेच यश दयालला आयपीएल २०२६ मध्ये मैदानापासून दूर राहावं लागल्याचं मानलं जात आहे. मात्र, हा निर्णय माझा नव्हता, या त्याच्या वक्तव्यामुळे आता आरसीबी व्यवस्थापनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र आरसीबी फ्रँचायजीने अद्याप त्याचा करार बाद केलेला नाही. त्याला २०२६ च्या करारानुसार ५ कोटी रुपये देण्यात आले आहेत.