Sunday, May 24, 2026

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा; अमित शहांसोबत होणार महत्त्वाची बैठक, राजकीय चर्चांना उधाण

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा; अमित शहांसोबत होणार महत्त्वाची बैठक, राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज म्हणजेच रविवार २४ मे रोजी अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाल्याने राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. दिल्लीमध्ये ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असून, या बैठकीत महायुतीतील विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपासह अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी १८ जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार भाजप १२ जागांवर उमेदवार उभे करणार असून, शिवसेनेला ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र काही जागांवरून मित्रपक्षांमध्ये अद्याप मतभेद कायम असल्याचे बोलले जात आहे. (Eknath Shinde)

विशेष म्हणजे, शिंदे (Eknath Shinde) गटाने विधान परिषदेच्या ६ जागांची मागणी केली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र भाजपकडून केवळ ४ जागांवर सहमती दर्शवण्यात आल्याने नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट दिल्ली गाठत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

या बैठकीत केवळ जागावाटपाचाच मुद्दा नाही, तर ‘ऑपरेशन टायगर’वरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षविस्तार, विरोधी पक्षांतील नेत्यांना आपल्या गटात आणण्याचे प्रयत्न आणि राजकीय रणनीती यावरही अमित शहा आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात सविस्तर चर्चा होऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी सकाळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना, “सध्या ज्या पक्षाकडे जागा आहे ती त्याच पक्षाला देण्याचा विचार सुरू आहे. त्यानंतर संख्याबळाच्या आधारे निर्णय घेतला जाईल,” असे सांगितले होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही हाच फॉर्म्युला वापरण्यात आला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, शिंदे (Eknath Shinde) यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे आता विधान परिषद जागावाटपाचा अंतिम निर्णय राज्यात नव्हे तर दिल्ली दरबारातच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे महायुतीतील राजकीय समीकरणांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Eknath Shinde)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >