मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार?; २३ मे च्या 'डेडलाईन'पूर्वी सरकारच्या वतीने मध्यस्थी
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा निर्माण होऊ पाहणारा आंदोलनाचा संघर्ष टाळण्यासाठी शासन आणि आंदोलनकर्ते यांच्यात पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेले जाहीर निमंत्रण स्वीकारत, भाजपचे वरिष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड उद्या, शुक्रवारी (२२ मे) थेट जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे जाऊन जरांगे यांची भेट घेणार आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये उद्या सकाळी साडेदहा वाजता अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक बैठक होणार असून, त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी येत्या ३० मे पासून पुन्हा एकदा 'आमरण उपोषणाची' घोषणा केली आहे. मात्र, त्यापूर्वी भाजप नेते प्रसाद लाड यांनी "सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून चर्चेतून मार्ग काढू," असे विधान केले होते. या विधानाचा संदर्भ घेत जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेतून लाड यांना चर्चेचे निमंत्रण दिले होते.
आमदार प्रसाद लाड हे उद्या, २२ मे रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल रामा इंटरनॅशनल येथून आंतरवली सराटीकडे प्रयाण करतील. त्यानंतर सकाळी १०:३० वाजता आंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील आणि लाड यांच्यात वैयक्तिक व सविस्तर चर्चा होईल. या भेटीदरम्यान राज्य सरकारच्या वतीने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत नेमका काय सकारात्मक तोडगा काढला जाऊ शकतो, यावर विस्तृत खलबते होण्याची शक्यता आहे.