अमरावती : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका अनोख्या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या 'जनता दरबार' कार्यक्रमात भाजपच्या महिला शहराध्यक्षा मेघा भारती यांनी चक्क महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना कागदाने वारा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
नेमका प्रकार काय?
दर्यापूर येथे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि महसूलमंत्र्यांच्या उपस्थितीत एका जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंत्री बावनकुळे हे नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत त्यांच्याशी संवाद साधण्यात मग्न होते. मात्र, याच वेळी त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या भाजपच्या महिला शहराध्यक्षा मेघा भारती यांनी हातात एक कागद घेतला आणि त्या चक्क मंत्र्यांना वारा घालू लागल्या. भर कार्यक्रमात घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
वरिष्ठ नेत्यांमधील विसंवाद दूर करणार; आमदारांशी साधणार व्यक्तिगत संपर्क मुंबई : दिवंगत अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण ...
बावनकुळेंनी तात्काळ रोखले अन् शिष्टाचाराची आठवण करून दिली
विशेष म्हणजे, मेघा भारती वारा घालत असल्याचे लक्षात येताच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना तसे करण्यापासून रोखले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्र्यांनी त्यांना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये शिष्टाचार आणि प्रोटोकॉल पाळण्याची सक्त सूचनाही दिली. मंत्र्यांनी स्वतः हस्तक्षेप करून हा प्रकार तत्काळ थांबवला असला तरी, तोपर्यंत ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यानंतर अल्पावधीतच हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आणि राजकीय चर्चांना उधाण आले.
सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
या व्हायरल व्हिडिओवर सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका बाजूला, अनेकांनी या घटनेवर सडकून टीका केली असून हा केवळ अतिउत्साह आणि अनावश्यक राजकीय खुशामत करण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्या बाजूला, काही लोकांनी बावनकुळे यांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे; मंत्र्यांनी स्वतः या कृतीला प्रोत्साहन न देता वेळीच रोखल्याने त्यांनी एक चांगला संदेश दिल्याची भावना काही युजर्सनी व्यक्त केली आहे. सध्या राज्यभरात आढावा बैठका आणि जनसंपर्क मोहिमांमध्ये व्यस्त असलेल्या बावनकुळे यांनी नुकतीच मुंबईतही अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आहे. १५ मे रोजी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत त्यांनी महसूल विभागाला अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक कारभार करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. या महत्त्वाच्या बैठकीला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार विक्रांत पाटील, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कट्यार आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महसूल विभाग हा नागरिकांच्या दैनंदिन समस्या आणि मालमत्तेच्या अधिकारांशी थेट जोडलेला असतो, याची आठवण करून देत बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. प्रशासनाने स्वतःहून स्थानिक पातळीवर दौरे करावेत, तळागाळातील जनतेच्या समस्या समजून घ्याव्यात आणि योग्य नियोजनाच्या माध्यमातून त्या जलद गतीने सोडवाव्यात, असे आदेश त्यांनी या बैठकीत दिले आहेत.