Monday, May 18, 2026

Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) Nagpur : RSS मुख्यालयाजवळ मध्यरात्री गोळीबार; ३ बाईकवरून आलेल्या ६ गुन्हेगारांची दहशत

Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) Nagpur : RSS मुख्यालयाजवळ मध्यरात्री गोळीबार; ३ बाईकवरून आलेल्या ६ गुन्हेगारांची दहशत

नागपूर : नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयाजवळ मध्यरात्री गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोठीरोड महाल परिसरात रविवारी रात्री सराईत गुन्हेगारांनी भररस्त्यात दोन वेळा हवेत गोळीबार केला. विशेष म्हणजे, ही घटना संघ मुख्यालयापासून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर आणि केवळ पाच मिनिटांच्या अंतरावर घडल्याने नागपूर पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ११:३० ते १२ वाजण्याच्या सुमारास तीन वेगवेगळ्या दुचाकींवरून सहा जणांची टोळी कोठीरोड परिसरात दाखल झाली. परिसरात अचानक आलेल्या या टोळीमुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याचदरम्यान, रवी मोहतो आणि गंगा काकडे या दोन कुख्यात गुन्हेगारांनी कमरेतून पिस्तूल बाहेर काढत भरचौकात दोन वेळा हवेत गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी जीव वाचवण्यासाठी पळापळ केली.

या प्रकरणी सौरभ नावाच्या तरुणाने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोळीबार करणारे आरोपी हे अमली पदार्थांच्या विक्री आणि तस्करीशी संबंधित सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. परिसरात स्वतःचे वर्चस्व निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि ड्रग्ज व्यवसायातील अंतर्गत वादातून हा गोळीबार करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, संघाच्या केंद्रीय मुख्यालयामुळे महाल परिसर आणि आसपासच्या भागात कायम कडक पोलीस बंदोबस्त आणि नियमित गस्त असते. असे असतानाही गुन्हेगारांनी पोलिसांना थेट आव्हान देत मुख्यालयाच्या अगदी जवळ गोळीबार केल्याने नागपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >