मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) १८ मे रोजी एअर इंडिया (Air India) आणि एअर इंडिया एक्स्प्रेसच्या (Air India Express) विमानसेवेला मोठा फटका बसला आहे. ग्राउंड हँडलिंगचे काम पाहणाऱ्या 'एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड'च्या (AIASL) कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारल्याने ही अभूतपूर्व परिस्थिती उद्भवली. या संपामुळे विमानतळावरील दैनंदिन कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले असून, हैदराबादहून मुंबईत दाखल झालेल्या एका विमानातील प्रवाशांना तर लँडिंगनंतरही विमानतळावर ताटकळत राहण्याची वेळ आली.
विमानातच अडकले प्रवासी आणि सामानासाठीही प्रतीक्षा
'इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, संपामुळे उद्भवलेली परिस्थिती इतकी भयंकर होती की, विमान रनवेवर सुरक्षित उतरल्यानंतरही प्रवाशांना तब्बल एक तास विमानातच बसून राहावे लागले. विमानातून बाहेर आल्यानंतरही त्यांचा मनस्ताप संपला नाही; कारण त्यांना आपले सामान (बॅगेज) मिळवण्यासाठी बेमुदत प्रतीक्षा करावी लागली. या संपामुळे केवळ येणाऱ्याच नव्हे, तर मुंबईतून सुटणाऱ्या अनेक विमानांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असून, विमानतळावर सर्वत्र गोंधळाचे आणि हतबलतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोशल मीडियावर प्रवाशांचा संताप
विमानतळावरील या अनागोंदी कारभारामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी सोशल मीडियाचा आधार घेत एअर इंडियाच्या व्यवस्थापनावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. एका प्रवाशाने या संपूर्ण प्रकाराला 'अत्यंत लाजीरवाणी घटना' असे संबोधले. मंगळुरूला जाणाऱ्या एका प्रवाशाने तर संताप व्यक्त करत थेट सुनावले की, "जर तुम्हाला विमानसेवा सुरळीत चालवता येत नसेल, तर दर तासाला प्रवाशांना असा मनस्ताप देण्यापेक्षा एअरलाईन्स पुन्हा सरकारच्या ताब्यात द्या." तर, दिल्लीहून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी तक्रार केली की, लँडिंगनंतर तासाभरानतंरही सामान बेपत्ता आहे आणि मदतीसाठी तिथे कंपनीचा कोणताही कर्मचारी उपस्थित नाही.
उत्तर प्रदेश : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh Minister) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ...
चौकशी कक्षाबाहेर प्रवाशांच्या रांगा
कोचीला जाणाऱ्या (AI 2517) विमानाच्या एका प्रवाशाने आपली आपबिती मांडताना सांगितले की, दुपारी १.३० वाजताचे नियोजित उड्डाण असूनही ते मुंबई विमानतळावर अडकून पडले आहेत. चौकशी केली असता, 'विमानतळावरील कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न प्रलंबित असल्याने हा विलंब होत आहे', अशी मोघम उत्तरे एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली. सध्या सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये वैतागलेले प्रवासी योग्य माहिती मिळवण्यासाठी विमानतळावरील चौकशी कक्षाबाहेर (Information Desk) लांबच लांब रांगा लावून उभे असल्याचे आणि कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत असल्याचे दिसत आहे.
एअर इंडियाकडून अधिकृत स्पष्टीकरण आणि दिलगिरी
या वाढत्या गोंधळानंतर अखेर एअर इंडियाने एक अधिकृत निवेदन जारी करून आपली बाजू मांडली आहे. "मुंबई विमानतळावर एका थर्ड-पार्टी ग्राउंड हँडलिंग एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे आमच्या विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे. प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी आणि परिस्थिती लवकरात लवकर पूर्वपदावर आणण्यासाठी आमचे विमानतळावरील पथक सर्व संबंधित अधिकाऱ्यांसोबत युद्धपातळीवर काम करत आहे. या कठीण काळात तुम्ही दाखवलेल्या संयमाबद्दल आणि सहकार्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. कोणत्याही मदतीसाठी कृपया विमानतळावर उपस्थित असलेल्या आमच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा," असे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे.