Union Minister Son Arrested : केंद्रीय मंत्र्याच्या मुलाविरोधात गंभीर आरोप; दारू पाजून शोषण केल्याचा दावा

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार (Bandi Sanjay Kumar) यांचे पुत्र बंडी भगीरथ (Bandi Bhagirath) यांना शनिवारी (१६ मे) तेलंगणा पोलिसांनी अटक केली. अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी त्यांच्याविरोधात ‘पॉक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तेलंगणा उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या घटनेमुळे तेलंगणाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


अटकेपूर्वी केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, “माझा मुलगा बंडी भगीरथ याला आमच्या वकिलांमार्फत तपासासाठी तेलंगणा पोलिसांसमोर हजर करण्यात आले आहे.” तक्रार दाखल झाल्यानंतर लगेचच मुलाला पोलिसांना सहकार्य करण्याचे निर्देश दिल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, तेलंगणा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळत भगीरथला अधिकृतपणे अटक करण्यात आल्याचे स्पष्ट केले.



बंडी संजय कुमार यांनी पुढे सांगितले की, त्यांचा मुलगा सुरुवातीपासून स्वतः निर्दोष असल्याचा दावा करत आहे. त्याच्याकडे या प्रकरणात महत्त्वाचे पुरावे असून ते वकिलांसमोर सादर करण्यात आले आहेत. वकिलांच्या मते हा खटला न्यायालयात टिकणार नाही आणि त्याला जामीन मिळण्याची शक्यता असल्यानेच शरण येण्यास उशीर झाला. मात्र, प्रकरण अधिक लांबवणे योग्य नसल्याचे लक्षात घेऊन त्यांनी स्वतःहून मुलाला तपासासाठी पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे त्यांनी नमूद केले. सोमवारी न्यायालयाचा आदेश येण्याची शक्यता असली तरी न्यायव्यवस्थेचा आदर राखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



या प्रकरणाची सुरुवात ८ मे रोजी झाली. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर भगीरथविरुद्ध ‘लुकआऊट सर्कुलर’ जारी करण्यात आले. एफआयआरनुसार, भगीरथचे संबंधित अल्पवयीन मुलीसोबत संबंध होते. मुलीने त्याच्यावर लैंगिक शोषण, चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे तसेच जबरदस्तीने दारू पाजल्याचा गंभीर आरोप केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि ‘पॉक्सो’ कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.


दरम्यान, आरोपी बंडी भगीरथ यानेही पोलिसांकडे प्रति-तक्रार दाखल केली आहे. त्यात त्याने असा दावा केला की, संबंधित मुलगी त्याला तिच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये आणि विविध पार्ट्यांमध्ये स्वतः बोलवत होती. तसेच, मुलीच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आणि तब्बल ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोपही त्याने तक्रारीत केला आहे.


या संपूर्ण प्रकरणानंतर तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने आणि आंदोलनं झाली. विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. के. कविता (K. Kavitha) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहून या प्रकरणात निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच, चौकशी निष्पक्ष होण्यासाठी केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार यांना तत्काळ मंत्रीपदावरून हटवण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

Comments
Add Comment

Pakistan in WTC : षटकारांच्या संथ गतीचा फटका, ICC च्या कारवाईमुळे पाकिस्तान WTC मध्ये आठव्या स्थानी

मुंबई  : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट

KKR : कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ!

कोलकाता : आयपीएल २०२६ स्पर्धेतील ६० व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली. या सामन्यात गुजरात

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण

Belgium national football team : बेल्जियमचा वर्ल्ड कप संघ जाहीर, केविन डी. ब्रुयनला कर्णधारपद, ओपेंडा संघातून बाहेर

आगामी फिफा वर्ल्डकप २०२६ साठी (FIFA WORLD CUP 2026) बेल्जियम फुटबॉल फेडरेशनने २६ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. यावेळी

Ranbir Kapoor : रणबीर कपूर झाला अयोध्यावासी! ‘रामायण’ रिलीजआधी राम मंदिराजवळ ३.३१ कोटींची प्रॉपर्टी खरेदी

अयोध्या : रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या बहुचर्चित रामायण (Ramayana) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो प्रभू

Rachin Ravindra : केकेआरला मोठा धक्का ! एकही सामना न खेळता स्टार खेळाडू हंगामातून बाहेर

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये केकेआरने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. या हंगामात ११ पैकी चार सामने जिंकत ९ गुण मिळवले