मुंबई : सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, देशातील जनतेने अनावश्यक परदेश वाऱ्या टाळाव्यात, इंधनाची बचत करावी आणि परकीय चलनावर ताण येऊ नये म्हणून सोन्याची खरेदी मर्यादित ठेवावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले होते. या राष्ट्रीय सादेला त्वरित आणि सकारात्मक प्रतिसाद देत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी एका मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. यंदाच्या प्रतिष्ठेच्या 'कान्स चित्रपट महोत्सवा'चे (Cannes Film Festival) विशेष आमंत्रण हाती असूनही, केवळ देशाच्या हिताचा विचार करून त्यांनी आपला हा नियोजित दौरा शनिवारी रद्द केला आहे.
हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या एका भव्य मेळाव्याला संबोधित केले. हजारो ...
आंतरराष्ट्रीय मंचावर 'पैठणी'च्या सादरीकरणाची होती तयारी
आपल्या समाजमाध्यमांवरील एका सविस्तर निवेदनाद्वारे अमृता फडणवीस यांनी यामागची भूमिका स्पष्ट केली. कान्स चित्रपट महोत्सवाच्या जागतिक व्यासपीठावर महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि वारसा सादर करण्यासाठी त्यांना सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आले होते. या विशेष सोहळ्यासाठीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली होती. महाराष्ट्राची ओळख आणि शान असलेली येवल्याची अस्सल पैठणी या महोत्सवासाठी खास डिझाईन करण्यात आली होती. स्थानिक कारागिरांनी सलग तीन महिने रात्रंदिवस एक करून ही अद्वितीय कलाकृती केवळ याच सोहळ्यासाठी हाताने विणली होती. या तयारीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, ही पैठणी केवळ एक वस्त्र नसून ती महाराष्ट्राची कलाकुसर, परंपरा आणि कलात्मक वारशाचे प्रतीक आहे. जगभरातील दिग्गजांसमोर राज्याचे हे वैभव मांडण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, जेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी साधनसंपत्तीच्या काटेकोर वापरासाठी आणि काटकसरीसाठी देशवासीयांना आवाहन केले, तेव्हा त्यांनी आपले वैयक्तिक स्वप्न बाजूला ठेवले. हा निर्णय भावनिकदृष्ट्या अत्यंत कठीण होता, कारण यामागे अनेक कारागीर आणि फॅशन डिझायनर्सची कित्येक महिन्यांची मेहनत दडली होती. तरीही, आंतरराष्ट्रीय मंचावरील उपस्थिती आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा 'राष्ट्रहित' आणि 'सामूहिक जबाबदारी' सर्वोच्च असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
कारागिरांचे मानले आभार
आपला दौरा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करताना, अमृता फडणवीस यांनी या संपूर्ण प्रक्रियेत जोडल्या गेलेल्या सर्व कारागिरांचे, डिझायनर्सचे आणि हितचिंतकांचे मनापासून आभार मानले. त्यांच्या या अथक परिश्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी आपल्या संदेशाचा शेवट एका अत्यंत मार्मिक आणि प्रेरणादायी वाक्याने केला. त्या म्हणाल्या, "रेड कार्पेटला थोडी वाट पाहता येईल, पण माझा देश माझ्यासाठी नेहमीच प्रथम स्थानावर आहे."
काय होते पंतप्रधान मोदींचे आवाहन?
पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. याचा थेट फटका जागतिक पुरवठा साखळीला बसत आहे. या आर्थिक संकटाची झळ देशाला बसू नये आणि परकीय चलनाचा साठा सुरक्षित राहावा, यासाठी पंतप्रधान मोदींनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यांनी जनतेला खाजगी वाहनांऐवजी मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करण्याचे, अनावश्यक इंधन खर्च टाळण्याचे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. याच राष्ट्रीय आवाहनाला पाठिंबा दर्शवत अमृता फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे.