देशभरात २ मे २०२६ रोजी नीट परीक्षा पार पडली होती. मात्र परीक्षा संपल्यानंतर काही तासांतच पेपरफुटीचे गंभीर आरोप समोर आले. या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली. सुरुवातीला काही राज्यांमधून संशय व्यक्त करण्यात आला, मात्र नंतर राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर आणि लातूरपर्यंत या रॅकेटचे धागेदोरे पोहोचल्याचे समोर आले. काही आरोपींना अटकही करण्यात आली आहे. तपासादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे होत असून काही विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका पोहोचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या 'एच/पूर्व' विभागाने अतिक्रमण विरोधी मोहिमेत आता जोरात हाती घेत धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वांद्रे पूर्व येथील ...
हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर मानत केंद्र सरकारने तात्काळ हालचाली सुरू केल्या. प्रकरणाचा तपास थेट सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने प्राथमिक चौकशीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे संकेत दिल्यानंतर परीक्षा प्रक्रिया थांबवण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर ३ मे रोजी झालेली नीट परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, आता नीट परीक्षा २०२६ची नवी तारीख जाहीर करण्यात आली असून २१ जून २०२६ (21 June 2026) रोजी देशभरात पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. आयोगाने अधिकृत घोषणा करत विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा तयारीसाठी वेळ दिला आहे. मात्र, परीक्षा पुन्हा द्यावी लागणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांमध्ये मानसिक तणावाचे वातावरण कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलनं आणि नाराजी व्यक्त केली जात होती.
या संपूर्ण प्रकरणावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काल रात्री उशिरापर्यंत उच्चस्तरीय बैठक पार पडली. ही बैठक तब्बल दोन तास चालली. बैठकीत नीट आणि नेट परीक्षेतील पेपरफुटी, सुरक्षा व्यवस्था, परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
महापालिका प्रमुख रुग्णालयांमधील सुविधांचा घेतला आढावा मुंबई : महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमधील विविध सुविधांबाबत महापालिका आरोग्य समिती ...
या बैठकीला उच्च शिक्षण सचिव सचिन विनीत जोशी, शालेय शिक्षण सचिव संजय कुमार, एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह, राहुल सिंग आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आयोगाने यापूर्वीच सीबीआयला पूर्ण सहकार्य करण्याचे स्पष्ट केले आहे.
तपासादरम्यान नाशिकहून राजस्थानपर्यंत आणि राजस्थानहून हरियाणापर्यंत पेपर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. काही मोठी नावेही या प्रकरणात समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सीबीआयकडून कसून चौकशी सुरू आहे.
आता २१ जून रोजी होणारी नीट परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी केंद्र सरकार आणि आयोगाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य या परीक्षेशी जोडलेले असल्याने प्रशासनावर मोठी जबाबदारी आहे.