सोलापूर : सोलापूर जिल्हा (Solapur News) हा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचा गाभारा मानला जातो. येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे पंढरपूर (Pandharpur) आणि श्री स्वामी समर्थांचे अक्कलकोट (Akkalkot) यांसारखी जगप्रसिद्ध व भाविकांचे श्रद्धास्थान असलेली तीर्थक्षेत्रे आहेत. राज्यभरातून आणि देशभरातून येथे येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी या परिसरातील रस्त्यांचे जाळे मजबूत व अद्ययावत असणे अत्यंत आवश्यक होते. हीच गरज ओळखून केंद्र सरकारने या भागात भव्य महामार्ग प्रकल्प हाती घेतले आहेत. या महामार्गांमुळे भाविकांना आता तीर्थक्षेत्रांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे झाले आहे. विशेषतः दरवर्षी आषाढी वारीसाठी ऊन-पावसाची तमा न बाळगता पायी चालत येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सोय लक्षात घेऊन, त्यांच्यासाठी या महामार्गावर एक स्वतंत्र मार्गिका (लेन) तयार करण्यात आली आहे. यामुळे वारकऱ्यांची पायी वारी आता अधिक सुरक्षित आणि सुखकर होणार आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केला. याच पार्श्वभूमीवर, गुरुवारी (१४ मे) नितीन गडकरी यांनी स्वतः संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्राच्या राजकारणाचे भवितव्य ठरवणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या 'शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह' ...
आईच्या इच्छेपूर्तीचे समाधान आणि प्रकल्पाच्या पूर्णत्वाचे आश्वासन
या पाहणी दौऱ्यादरम्यान पालखी महामार्गाविषयी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जुन्या आठवणींना उजाळा देत भावूक झाले. ते म्हणाले की, "काही वर्षांपूर्वी तुळजापूर, पंढरपूर आणि अक्कलकोटला जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय होती. खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना तसेच वाहनाने येणाऱ्या भाविकांना प्रवासात मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. ही परिस्थिती पाहून माझ्या आईने मला आवर्जून सांगितले होते की, जर कधी भविष्यात तुला संधी मिळाली, तर या तीर्थक्षेत्रांना जोडणारे रस्ते नक्कीच चांगले कर." आईची तीच प्रबळ इच्छा आणि साक्षात पांडुरंगाच्या आशीर्वादाने आज मला या पवित्र मार्गाची सेवा करण्याचे आणि हे रस्ते उत्तम बनवण्याचे भाग्य लाभले आहे, अशी कृतज्ञतेची भावना त्यांनी व्यक्त केली.
महामार्गाच्या सद्यस्थितीबाबत माहिती देताना गडकरींनी स्पष्ट केले की, पालखी महामार्गाचे तब्बल ८० टक्के काम यशस्वीरित्या पूर्ण झाले असून, उर्वरित कामे युद्धपातळीवर मार्गी लावली जात आहेत. ज्या ठिकाणी काही कारणास्तव कामे रखडली आहेत, ती या वर्षाच्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच, वाखरी ते पंढरपूर या टप्प्यातील रस्त्याच्या कामाला रेल्वे प्रशासनाची अद्याप आवश्यक परवानगी मिळालेली नाही. मात्र, त्याबाबत तातडीने पाठपुरावा करून तो अडथळाही लवकरात लवकर दूर केला जाईल आणि वारकऱ्यांसाठी मार्ग मोकळा केला जाईल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.