Thursday, May 14, 2026

राज्यात ३० जूनपासून मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचा 'श्रीगणेशा'

राज्यात ३० जूनपासून मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचा 'श्रीगणेशा'

 'एसआयआर' मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर; ७ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

मुंबई : लोकशाहीचे अविभाज्य अंग असलेल्या मतदार याद्या अधिक पारदर्शक आणि त्रुटीरहित करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने 'विशेष सखोल पुनरीक्षण' (एसआयआर) मोहीम हाती घेतली आहे. पश्चिम बंगालसह मोठ्या राज्यांत या मोहिमेचे दोन टप्पे पार पडल्यानंतर आता महाराष्ट्रासह देशातील १६ राज्यांमध्ये 'एसआयआर' मोहिमेची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार, येत्या ३० जूनपासून राज्यातील निवडणूक यंत्रणा थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचणार असून, पडताळणीची ही प्रक्रिया २९ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेनंतर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

राज्यातील एकूण ९ कोटी ८६ लाख ६४ हजार ४१३ मतदारांच्या नोंदी तपासण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. यासाठी राज्यात ९७ हजार ९२४ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी घरोघरी जाऊन नवीन मतदार नोंदणी, मयत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे आणि पत्ता किंवा इतर दुरुस्त्यांचे काम पाहतील. या प्रक्रियेत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा (बीएलए) सहभागही अनिवार्य करण्यात आला असून, प्रत्येक केंद्रावर पारदर्शकता जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.निवडणूक आयोगाने सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामाशी समन्वय राखून हा कार्यक्रम निश्चित केला आहे. मतदार नोंदणीसह मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्याचे कामही २९ जुलैपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. ज्या मतदारांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांच्यासाठी नाव नोंदणीची ही मोठी संधी असून, त्रुटीरहित यादी तयार करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे. 'एसआयआर' कार्यक्रमाचा आराखडा असा घरोघरी जाऊन पडताळणी : ३० जून ते २९ जुलै प्रारूप (कच्ची) मतदार यादी प्रसिद्धी : ५ ऑगस्ट दावे व हरकती नोंदवण्याची मुदत : ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी : ७ ऑक्टोबर

Comments
Add Comment