Mumbai : मुंबईतील विविध यंत्रणांच्या ताब्यातील ६,१६० पाण्याच्या टाक्यांची तपासणीच झाली नसल्याचे उघड

डास प्रतिबंधात्मक उपाययोजना करता संयुक्त पाहणी करण्याचे आयुक्तांचे आदेश


बांधकामस्थळी ५ हजारांहून अधिक मनुष्यबळाचे प्रशिक्षण पूर्ण


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील २१ यंत्रणांच्या आस्थापना परिसरात ६,१६० पाण्याच्या टाक्यांसाठी डास प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबई महानगरपालिकेचा कीटकनाशक विभाग आणि विविध यंत्रणांच्या सहकार्याने संयुक्त पाहणी दौरा आयोजित करावा. येत्या ३१ मे २०२६ पर्यंत डास उत्पत्ती स्थानांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या अनुषंगाने विविध यंत्रणांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले.



मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या अध्यक्षतेखाली डास निर्मूलन समितीची आढावा बैठक महानगरपालिका मुख्यालयात गुरुवारी १४ मे २०२६ रोजी पार पडली. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, कीटकनाशक अधिकारी अमृत सूर्यवंशी यांच्यासह मुंबईतील विविध शासकीय, निम-शासकीय संस्था आणि प्राधिकरणांचे प्रतिनिधी या बैठकीसाठी उपस्थित होते. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, म्हाडा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई पोर्ट ट्रस्ट, नौदल, वायूदल, बेस्ट, डाक विभाग, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि., भाभा अणुसंशोधन केंद्र, दुग्ध विभाग, महावितरण, एल.आय.सी., विमानतळ प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, बीएसएनएल, एनटीसी अशा शासकीय, निम-शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी, प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते.




डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये कीटक नियंत्रण विभागाच्या चमुला स्थळ भेटींदरम्यान प्रवेश मिळवून देण्यासाठी मुंबईतील विविध यंत्रणांनी सहकार्य करावे. कीटक नियंत्रण विभागाला आवश्यक सहकार्य करत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात डास प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात. तसेच महानगरपालिकेच्यावतीने सुरु असलेल्या पावसाळी आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून रुग्णसंख्या कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले.



जीर्ण झालेल्या इमारती, गवत वाढलेली ठिकाणे, गिरण्यांचे भूखंड, विविध यंत्रणांचे प्रतिबंधात्मक क्षेत्र अशा ठिकाणी कीटक नियंत्रण विभागाच्या चमूला पोहचण्यासाठी येणारे अडथळे दूर करण्यात यावेत. याठिकाणी संयुक्तपणे प्रयत्न करत डास प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे पावसाळी आजारांमध्ये वाढणाऱ्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल.



बांधकामस्थळी ५ हजारांहून अधिक मनुष्यबळाला प्रशिक्षण पूर्ण


मुंबईतील इमारत पुनर्विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. बांधकाम प्रकल्पस्थळी डास प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठीचे प्रशिक्षण सुरक्षा अधिकारी तसेच कामगार वर्गाला देण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ५ हजाराहून अधिक मनुष्यबळाला डास प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच संवाद व समन्वयासाठी सुरक्षा अधिकारी आणि कीटक नियंत्रण विभाग यांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला आहे.


पावसाळापूर्ण उपाययोजनांचा भाग म्हणून कीटक नियंत्रण विभागाच्या चमुने फेब्रुवारी महिन्यापासूनच विविध आस्थापनांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटीद्वारे पाण्याच्या टाक्यांवर लावण्यात आलेल्या झाकणांची तपासणी करण्याची मोहीम राबविली आहे. तपासणीदरम्यान काही ठिकाणी पाण्याच्या टाक्यांची झाकणे सुस्थितीत नसल्याचे तसेच योग्यरित्या लावण्यात न आल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच अडगळीतील वस्तू, साहित्य निष्कासन कार्यवाही पूर्ण झालेली नाही, असे आढळून आले आहे. काही ठिकाणी अभियांत्रिकी पद्धतीच्या उपाययोजना राबविण्याची गरज आहे. स्थळ भेटीच्या मोहिमेच्या माध्यमातून विविध शासकीय आणि निमशासकीय यंत्रणांना पावसाळ्याआधीच डास प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ३१ मे २०२६ पर्यंत संयुक्त मोहिमेच्या माध्यमातून डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांची नियोजनबद्धरित्या पूर्तता करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले.

Comments
Add Comment

Mayor Ritu Tawde : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील नालेसफाईसह रस्ते कामांची महापौरांनी केली पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील नद्या आणि लहान-मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे महानगरपालिका

 नाशिक : भोंदूबाबा खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांचे निलंबन

 भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील निलंबित -१४३ वेळा कॉल आणि आर्थिक गुंतवणुकीचा

BCCI SQUAD ANNOUNCE : श्रीलंका दौऱ्यासाठी भारत अ संघाची घोषणा, तिलक वर्मा नवीन कर्णधार !

आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्प्यात आहे. २०२६ हंगामाचा अखेरचा सामना ३१ मे रोजी होणार आहे. याच दरम्यान BCCI ने

Unauthorized Hawkers : टँक पाखाडी मार्ग आणि हाफिज अली खान मार्गावरील अनधिकृत फेरीवाले, गॅरेज व भंगार विक्रेत्‍यांवर BMC ची कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  ‘ई’ विभाग अंतर्गत प्रभाग क्रमांक २१२ मधील वॉटर स्‍ट्रीट कॉर्नर, टँक पाखाडी मार्ग व

Maharashtra : राज्यातील १८३ तालुक्यांत पारा ४५ अंशांवर

उष्णतेची तीव्र लाट; मागील वर्षीच्या तुलनेत जलसाठा मात्र समाधानकारक मुंबई : मे महिन्याचा पंधरवडा उलटत असतानाच

मुंबई क्लायमेंट वीकच्या निष्पत्ती व परिणामकारकता अहवालाचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

 दुसरा ‘मुंबई क्लायमेट वीक’ फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार मुंबई : हवामान बदलाच्या प्रश्नांवर जागतिक स्तरावरील