Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री; सोनं-चांदी ते दूधाच्या दरात मोठी वाढ

नवी दिल्ली : गेल्या चार दिवसांत देशाच्या आर्थिक आणि वित्तीय क्षेत्रात झपाट्याने घडामोडी घडताना दिसत आहेत. पश्चिम आशियातील वाढता तणाव, इराणमधील संकट आणि जागतिक अनिश्चिततेचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ लागला आहे. महागाईचा दबाव वाढत असताना शेअर बाजारातही अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं आहे. रोजच्या गरजांच्या वस्तूंपासून इंधनापर्यंत अनेक गोष्टी महागल्याने सामान्य नागरिकांचं मासिक बजेट कोलमडण्याची चिन्हं दिसत आहेत.


पंतप्रधानांचं जनतेला मोठं आवाहन


पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काही महत्त्वाची आवाहनं केली आहेत. पेट्रोलियम पदार्थांचा वापर मर्यादित ठेवावा, परकीय चलन साठा टिकवण्यासाठी सोन्याची खरेदी काही काळ टाळावी, तसेच कंपन्यांनी पुन्हा ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीचा विचार करावा, असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय खतांचा वापर ५० टक्क्यांनी कमी करण्याचं आणि परदेश पर्यटनाऐवजी देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य देण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या वक्तव्यानंतर देशात आर्थिक मंदी, इंधन टंचाई आणि वाढत्या महागाईबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.



सोनं-चांदीच्या दरात मोठी उसळी


केंद्र सरकारने सोनं आणि चांदीवरील आयात शुल्कात मोठी वाढ करत ते ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत नेलं आहे. या निर्णयाचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्या-चांदीच्या दरांवर झाला आहे. बुधवारी अवघ्या एका दिवसात सोन्याच्या किमतींमध्ये तब्बल ९ ते ११ हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा दर प्रति तोळा पावणे दोन लाख रुपयांच्या घरात पोहोचला आहे. चांदीच्या दरातही मोठी वाढ नोंदवण्यात आली असून गुंतवणूकदारांसह ग्राहकांनाही याचा मोठा फटका बसत आहे.


दूधही महागलं; सर्वसामान्यांवर आणखी भार


महागाईच्या झटक्यात आता दुधाचाही समावेश झाला आहे. अमूल आणि मदर डेअरी या प्रमुख दूध उत्पादक कंपन्यांनी दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. अमूलच्या ५०० मिली A2 म्हशीच्या दुधाची किंमत ३७ रुपयांवरून ३९ रुपये करण्यात आली आहे. तर १ लिटर अमूल गोल्ड दूधासाठी आता ग्राहकांना ६९ रुपये मोजावे लागणार असून यापूर्वी ही किंमत ६७ रुपये होती. अमूल टी स्पेशल दुधाचा दर ६३ रुपयांवरून वाढून ६६ रुपये झाला आहे. याशिवाय अमूल ताजा आणि शक्ती दूधाच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. अमूलनंतर इतर दूध उत्पादक संघांकडूनही लवकरच दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



रुपयाची विक्रमी घसरण, महागाईत वाढ


कच्च्या तेलाच्या वाढत्या आयात खर्चामुळे भारतीय रुपयावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ९५.७० या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे. दरम्यान, १२ मे रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार देशातील किरकोळ महागाई दर (CPI) ३.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर ४.२० टक्क्यांपर्यंत वाढल्याने सामान्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.


पेट्रोल-डिझेल महागण्याचे संकेत


इराणमधील परिस्थिती आणखी चिघळली आणि कच्च्या तेलाच्या किंमती वाढत राहिल्या, तर त्याचा मोठा आर्थिक ताण सरकारवर पडू शकतो, अशी चिंता RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे. वाढत्या इंधन खर्चाचा भार सरकारला दीर्घकाळ सहन करणं कठीण जाऊ शकतं. त्यामुळे येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करून त्याचा भार थेट ग्राहकांवर टाकला जाऊ शकतो, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment

Kolkata building collapse : भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली

ताराताला परिसरात मोठी दुर्घटना, अनेक जण जखमी कोलकाता : पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकाता (Kolkatta) येथे बुधवारी

LOC News : भारताकडून सिंधू नदीचे पाणी रोखल्यानंतर LoC वर पाकिस्तानची मोठी सैन्यबांधणी! ३५ अँटी-ड्रोन युनिट तैनात

- AI फेन्सिंगसह युद्धसज्जतेला वेग नवी दिल्ली : भारताने सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानकडे जाण्यापासून रोखल्यानंतर आणि

Jharkhand T20 League : झारखंड टी-२० लीग फायनलला गालबोट! स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; ३५ जण जखमी

रांची : झारखंडची राजधानी रांची येथे झारखंड टी-२० लीगच्या (Jharkhand T20 League) अंतिम सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली.

Fire Accident :लखनऊ कोचिंग क्लास आगप्रकरणी चौघांना अटक, चार अधिकारी निलंबित

लखनऊ(Lucknow) : अलीगंज (सेक्टर-डी) येथे एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश

Amit Shah : नाफेडच्या लिलाव पोर्टलचा शुभारंभ

नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ

Pakistan's war threats : पाकिस्तानच्या युद्धाच्या धमक्यांना भारताचे प्रत्युत्तर

नवी दिल्ली : पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला सिंधू जल करार आणि युद्धाबाबत दिलेल्या