Mumbai : नदी आणि नाल्यातील गाळ ४८ तासांत उचलाच, अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांचे निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नदी / नाल्यातून काढलेला गाळाची ४८ तासांच्या आत निर्धारित ठिकाणी नेऊन विल्हेवाट लावणे आवश्‍यक आहे. तरीही काही ठिकाणी आजपर्यंत काढलेल्‍या गाळाची वाहतूक प्रलंबित असल्‍याचे आढळले आहे. या पार्श्‍वभूमीवर, गुरूवार १४ मे आणि शुक्रवार, १५ मे २०२६ या दोन दिवशी गाळ वाहतुक करण्‍याकामी विशेष मोहिम राबवावी. नाल्‍यांतून काढलेला गाळ कोणत्‍याही परिस्थितीत रस्‍त्‍याकडेला प्रलंबित राहणार नाही, हे सुनिश्चित करावे. गाळ काढल्‍यानंतर ४८ तासांत त्‍याचे वहन होईल, याची खातरजमा करावी. गाळ वाहतूक प्रलंबित राहिल्‍याचे आढळल्‍यास संबंधित अभियंत्‍यांविरोधात कठोर कारवाई करू, असा इशारा अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी दिला. पाणी साचण्‍याच्‍या ठिकाणांवर लक्ष केंद्रीत करून पाण्‍याचा जलद गतीने निचरा होण्‍याकामी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना आखाव्‍यात. दुय्यम अभियंता, सहायक अभियंता यांनी दररोज प्रत्‍यक्ष कार्यस्‍थळी उपस्थित रहावे, असे निर्देशही बांगर यांनी दिले.



यंदाच्‍या पावसाळयाच्‍या पार्श्‍वभूमीवर मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नदी / नाल्‍यांतून गाळ काढण्‍याच्‍या कामांची आढावा बैठक अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली बुधवारी १३ मे २०२६ रोजी महानगरपालिका मुख्‍यालयात संपन्‍न झाली. प्रमुख अभियंता (पर्जन्‍य जलवाहिन्‍या) सुनीलदत्‍त रसाळ यांच्‍यासह संबंधित विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.



अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर म्‍हणाले की, मुंबई महानगरातील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे ३१ मे २०२६ पर्यंतच्‍या विहित मुदतीत पूर्णत्‍वाकडे न्‍यावीत. त्यादृष्टीने नियोजन करून संपूर्ण यंत्रणेने कार्यवाहीला वेग द्यावा. गाळ काढण्याची कामे योग्यरित्या होण्यासह त्यावर देखरेख करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्‍या दुय्यम अभियंता, सहायक अभियंता यांनी प्रत्‍यक्ष कार्यस्‍थळी हजर रहावे. नाल्यांमधून काढलेल्‍या गाळाची ४८ तासांत वाहतूक करावी. रस्‍त्‍याकडेला गाळाचा ढीग आढळता कामा नये. पुढील ४८ तासात विनिर्दिष्ट ठिकाणी गाळाची विल्‍हेवाट लावावी. नागरिक, लोकप्रतिनिधी यांची तक्रार आल्‍यास संबंधितांविरोधात कारवाई करण्‍यात येईल.



अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) बांगर म्‍हणाले की, नालेस्‍वच्‍छतेचे, गाळ काढण्‍याचे १०० टक्‍के उद्दिष्‍ट पूर्ण करणे आवश्‍यक आहे. मात्र्, उदिृष्‍ट पूर्ण करून नालेस्‍वच्‍छतेची कामे थांबू नयेत. त्‍याचबरोबर पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा अभियंत्‍यांनी स्‍वयंप्रेरणेने शोध घ्‍यावा. आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्‍यात. पावसाचे पाणी साचते त्‍या ठिकाणचा व आजूबाजूच्‍या परिसराचा स्‍थळनिहाय अभ्‍यास करावा. ५० / १०० मीटरच्‍या परिघातील पर्जन्‍य जलवाहिन्‍या, बंदिस्‍त वाहिन्‍या, कल्‍वर्टची परिणामकारकपणे स्‍वच्‍छता करावी. त्‍या तुंबणार नाहीत, याची खातरजमा करावी. एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत वाहिन्‍या संपूर्णत: मोकळया करण्‍यात आल्‍या आहेत का, याची खातरजमा करावी.


नाल्‍यालगतच्‍या रहिवाशांकडून नाल्‍यात मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्‍याच्‍या तक्रारी असल्‍या तरी तरीही तरंगत्‍या कच-याची (फ्लोटींग मटेरियल) योग्‍यप्रकारे विल्‍हेवाट लावावी. नालेस्‍वच्‍छतेची / गाळ काढण्‍याची कामे पूर्ण झाली असली तरी मे महिन्‍याच्‍या अखेरच्‍या आठवड्यात आणि जून महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवड्यात पुन्‍हा - पुन्‍हा तरंगता कचरा बाहेर काढण्‍यात यावा. त्‍यासाठी मोहिम राबवावी. पावसाळा सुरू होण्‍यापूर्वी तरंगता कचरा काढणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. तरंगता कचरा आढळणारी ठिकाणे निश्चित करून एकापेक्षा अधिक वेळा तरंगता कचरा बाहेर काढावा, असेही निर्देश बांगर यांनी दिले.


नालेस्‍वच्‍छतेची कामे गुणवत्‍तापूर्ण व्‍हावीत यासाठी कायमच दक्ष रहावे. त्‍यासाठी स्‍थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांच्‍याशी समन्‍वय, संवाद साधावा. दैनंदिन कार्यवाहीची माहिती लोकप्रतिनिधींना द्यावी, नालेस्‍वच्‍छतेची कामे पाहण्‍यासाठी स्‍थानिक नगरसेवकांना निमंत्रित करावे, असेदेखील अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त बांगर यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

World Environment Day 2026 : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड येथे होणार १६ हजार वृक्षांची लागवड

- शुक्रवारी ५ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजता या उपक्रमाचा शुभारंभ - मुंबईकर नागरिकांनी या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी

Aamir Khan : आमिर खानची तिसऱ्या लग्नाची तयारी ; चर्चांवर आमिर खानची प्रतिक्रिया

मुंबई : वयाच्या ६१ व्या वर्षी आमिर खान तिसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे अशी घोषणा त्याने स्वतःह एका मुलाखती

Wipro Office Religious Harassment : TCS नंतर आता विप्रोही वादाच्या भोवऱ्यात? धर्म बदलण्यास नकार दिल्याने नोकरी गमवावी लागली; पुण्यातील माजी कर्मचारीचा गंभीर आरोप

पुणे : नाशिकमधील TCS कार्यालयात कथित धार्मिक छळ आणि धर्मांतराच्या दबावाच्या आरोपांनंतर आता पुण्यातील आयटी कंपनी

Pranit More : कॉमेडियन प्रणित मोरे वादाच्या भोवऱ्यात; आक्षेपार्ह व्हिडीओवर माफी, म्हणाला- ती चूक झाली

Pranit More Controversy : बिग बॉस 19 चा स्पर्धक आणि प्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरे सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे वादात सापडला आहे.

Shrirampur ATS Raid : पाकिस्तानी गँगस्टरच्या सोशल मीडिया नेटवर्कचा महाराष्ट्रात शिरकाव? श्रीरामपूरमध्ये ATS ची मोठी कारवाई, चार जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात मोठी कारवाई करत चार संशयितांना

Minister Makarand Jadhav-Patil : राज्यात नवे पुनर्वसन धोरण येणार

मंत्री मकरंद जाधव-पाटील; कालानुरूप सर्व बदल समाविष्ट करणार मुंबई : राज्यातील दरडप्रवण गावांचे कायमस्वरूपी