Tuesday, May 12, 2026

Prateek Yadav Death : अखिलेश यादव यांचे बंधू प्रतीक यादव यांचे संशयास्पद निधन; लखनौमध्ये खळबळ

Prateek Yadav Death : अखिलेश यादव यांचे बंधू प्रतीक यादव यांचे संशयास्पद निधन; लखनौमध्ये खळबळ

लखनौ : उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मुलायम सिंह यादव यांचे धाकटे चिरंजीव आणि भाजप नेत्या अपर्णा यादव (Aparna Yadav) यांचे पती प्रतीक यादव (Pratik Yadav) यांचे आज (१३ मे २०२६) लखनौमध्ये निधन झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लखनौ येथील सिव्हिल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. प्रतीक यादव यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून रुग्णालयाबाहेर समर्थकांनी आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे.

अखिलेश यादव यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या कुटुंबासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. प्रतीक यादव हे मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचे पुत्र आणि अखिलेश यांचे सावत्र भाऊ होते. प्रतीक यादव हे राजकारणाऐवजी व्यवसाय आणि फिटनेस क्षेत्रात अधिक सक्रिय होते. गेल्या काही काळापासून प्रतीक आणि त्यांच्या पत्नी अपर्णा यादव यांच्यात काही कारणावरून मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या, अशातच त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे.

मृत्यूचे गूढ वाढले; झोपेतच बिघडली प्रकृती?

प्रतीक यादव यांच्या मृत्यूबाबत काही संशयास्पद बाबी समोर येत आहेत. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक हे घरी झोपलेले असतानाच सकाळी ६:१५ च्या सुमारास त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना तातडीने लखनौच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता असे सांगितले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा त्यांची पत्नी अपर्णा यादव त्यांच्या सोबत नव्हत्या, असेही समजते.

शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचे लक्ष

प्रतीक यादव यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमांच्या खुणा आढळलेल्या नाहीत, त्यामुळे हे निधन नैसर्गिक आहे की त्यामागे काही वेगळे कारण आहे, याचे गूढ वाढले आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून मृतदेहाचा पंचनामा पूर्ण करण्यात आला आहे. डॉक्टरांचे एक विशेष पथक आता शवविच्छेदन (Post-Mortem) करणार असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच या मृत्यूमागचे नेमके सत्य समोर येईल.

Comments
Add Comment