Monday, May 11, 2026

Water Cut : मुंबईत शुक्रवारपासून दहा टक्के पाणीकपात होणार

Water Cut : मुंबईत शुक्रवारपासून दहा टक्के पाणीकपात होणार

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात झालेली घट आणि आगामी पावसाळ्याबाबतचा हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन, मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण शहरात १० टक्के पाणीकपात जाहीर केली आहे. हा निर्णय १५ मे २०२६ पासून लागू होणार असून, समाधानकारक पाऊस पडेपर्यंत ही कपात कायम राहणार आहे. समाधानकारक पाऊस होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता हातचे राखून पाण्याचा वापर करावा लागणार आहे.

सोमवारी ११ मे रोजीची आकडेवारी लक्षात घेता, मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मिळून एकूण ३ लाख ४० हजार ३९९ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटरच्या तुलनेत सध्या २३.५२ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीसाठ्यावर महापालिका प्रशासनाचे अत्यंत बारकाईने लक्ष असून दररोज नियोजनपूर्वक पाणीपुरवठा केला जात आहे. महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, मुंबईसाठी भातसा धरणातून १,४७,०९२ दशलक्ष लीटर आणि अप्पर वैतरणा धरणातून ९०,००० दशलक्ष लीटर अतिरिक्त राखीव साठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे सध्यातरी पाण्याचे गंभीर संकट नसले, तरी भविष्यातील गरज ओळखून ही कपात करण्यात आली आहे. मुंबईकरांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, मात्र पाणीसाठा मर्यादित असल्याने प्रत्येकाने पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने आणि जबाबदारीने करावा, असे विनम्र आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सायन-कोळीवाडा भागात नागरिकांचे हाल : सायन-कोळीवाडा येथील भारतीय कमला नगर, चांदणी नगर आणि विजय नगर भागात पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्याने स्थानिक रहिवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रभाग १७४ च्या नगरसेविका साक्षी कनोजिया यांनी सांगितले की, त्यांना सतत कमी दाबाच्या तक्रारी मिळत आहेत. तसेच काही ठिकाणी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.

कुलाबा भागात पाण्याचा दाब १० टक्के कमी : कुलाबा परिसरातही ७ मे पासूनच पाणी कपात होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांच्याकडे केल्या आहेत. नार्वेकर यांनी प्रश्न उपस्थित केला की, प्रशासन माहिती न देता असे कसे करू शकते? त्यांनी सांगितले की, पाण्याचा दाब कमी झाल्यामुळे १५ मिनिटांत भरणारी टाकी आता ३० मिनिटांतही भरत नाहीये.

इतर शहरांवरही परिणाम : मुंबई महापालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आणि इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, तिथेही १५ मे पासून १० टक्के पाणीकपात लागू असेल.

Comments
Add Comment