अवघ्या १० दिवसांत बोरघाटातील चित्र बदलले; वेळ आणि इंधनाची बचत करत 'सुसाट' प्रवास
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (एक्स्प्रेस वे) प्रवासातील सर्वात कठीण टप्पा समजला जाणारा बोरघाट आता वाहतूक कोंडीतून मुक्त झाला आहे. गेल्या अनेक दशकांपासून प्रवाशांच्या संयमाची परीक्षा पाहणाऱ्या खंडाळा-लोणावळा घाटातील सुमारे ७० टक्के हलकी वाहतूक आता नवनिर्मित 'मिसिंग लिंक'कडे वळली आहे. अवघ्या १० दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या मार्गामुळे घाटातील वाहनांच्या लांबच लांब रांगा गायब झाल्या असून मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित झाला आहे.मे महिन्यातील उन्हाळी सुट्ट्या आणि शनिवार-रविवारचा 'विकेंड' म्हणजे बोरघाटात ५ ते ६ किलोमीटरच्या रांगा हे समीकरणच बनले होते. मात्र, 'मिसिंग लिंक' सुरू झाल्यापासून हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. सध्या केवळ ३० टक्के अवजड वाहने जुन्या घाट मार्गाचा वापर करत असल्याने लोणावळा-खंडाळ्यातील तीव्र वळणे आता मोकळा श्वास घेत आहेत.
New rules regarding gas cylinders : इराण अमेरिका युद्धाने अनेक देशात खळबळ उडाली आहे. भारतावर देखील याचा मोठा परिणाम झाला आहे. इंधन, एलपीजीच्या (LPG) दरात मोठी वाढ होत आहे. ...
मिसिंग लिंकमुळे प्रवासाचे एकूण अंतर ६ किलोमीटरने कमी झाले आहे. परिणामी, मुंबई ते पुणे या प्रवासातील २५ ते ३० मिनिटांचा मौल्यवान वेळ वाचत आहे. घाटातील तीव्र चढ-उतार आणि वळणांमुळे होणारी वाहतूक कोंडी आता पूर्णपणे नाहीशी झाली आहे. घाट उतरताना होणारे भीषण अपघात हा चिंतेचा विषय होता. नवीन मार्ग सुरक्षित असल्याने गेल्या १० दिवसांत या मार्गावर एकाही अपघाताची नोंद झालेली नाही. एक्स्प्रेस वे सहा पदरी असला, तरी ५.६८ किमीचा हा नवीन भाग आठ पदरी आहे. त्यामुळे वाहनांना अधिक वेग आणि मोकळी जागा मिळत आहे. घाटातील संथ वाहतुकीमुळे होणारा इंधनाचा अपव्यय बोगद्यातील प्रवासामुळे टळला आहे. ७ वर्षांच्या परिश्रमाचे फलित
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) २०१९ मध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेतले होते. सुमारे ६ हजार ७०० कोटी रुपये खर्च करून सात वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. लोणावळा-खंडाळा शहरांना बायपास करून थेट बोगद्यातून नेणाऱ्या या मार्गामुळे प्रवाशांचे 'सुसाट' प्रवासाचे स्वप्न अखेर सत्यात उतरले आहे






