Dahisar River Revival Project : नदीत कचरा टाकणे जेव्हा बंद होईल, तेव्हाच दहिसर नदी स्वच्छतेचे जनआंदोलन होईल यशस्वी; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल स्पष्टच बोलले

- दहिसर नदी पुनरुज्जीवन, सौंदर्यीकरण प्रकल्प (टप्पा १) कामाचे लोकार्पण


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


नदी स्वच्छतेसाठी फक्त मुबंई महानगरपालिकेचे प्रयत्न पुरेसे नाहीत, नागरिकांनीही या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यायला हवा. नदीत कचरा टाकणे जेव्हा बंद होईल, तेव्हाच दहिसर नदी स्वच्छतेचे जनआंदोलन यशस्वी होईल. दहिसर नदीच्या आगामी टप्प्यातील सौंदर्यीकरणाच्या कामामुळे याठिकाणी पर्यटनाला वाव मिळावा. तसेच दहिसर नदीचा एसटीपी प्रकल्प देशात रोल मॉडेल ठरावा, असे वक्तव्य केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केले.


दहिसर नदी पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरण प्रकल्प (टप्पा १) चे लोकार्पण केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या शुभहस्ते दहिसर येथे आयोजित कार्यक्रमात रविवारी १० मे २०२६ सायंकाळी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.



केंद्रीय मंत्री पीयूष गोयल पुढे म्हणाले की, देशभरात ३५० नद्या पुनर्जीवित करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. अशावेळी दहिसर एसटीपीच्या निमित्ताने पर्यटन व मनोरंजन क्षेत्र म्हणून या भागाचा विकास करण्याची मोठी संधी आहे. दहिसर नदीच्या पात्रात खोलीकरण करावे, गाळ काढावा, नैसर्गिक पाण्याचे झरे जिवंत करावेत, असे आवाहन गोयल यांनी केले. या प्रकल्पामुळे पावसाळ्यातील पुराची समस्या मार्गी लागणार आहे. नदी स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी यांनी दिवसातून दोन वेळा कचरा काढण्यात येतो का, याची खातरजमा करावी, असे आवाहन श्री. गोयल यांनी केले.


उप महापौर संजय घाडी म्हणाले की, दहिसर नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे लोकार्पण हे मातृदिनी होत आहे, याचा आनंद आहे. नागरिकांना नदीत कचरा न टाकण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत हात जोडून करावे, असे ते म्हणाले. तसेच बेशिस्तपणे, सातत्याने कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करावी. प्रदूषण मुक्तीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.



दहिसर एसटीपी प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक गॕरेज, वाहन धुणे, इमारत बांधकाम, रस्ते स्वच्छता यासारख्या बाबींसाठी पाण्याची गरज भागविण्याकरिता मदत होणार आहे. येत्या काळात दहिसर प्रकल्प बाधितांसाठी राहण्यासाठी घरे देण्याची प्रक्रिया वेगवान होईल. या प्रकल्पात १,२४४ प्रकल्प बाधितांसाठी घराची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांनी सांगितले.


उप महापौर संजय घाडी, स्थानिक आमदार मनीषा चौधरी, आमदार प्रकाश सुर्वे, विधी समिती अध्यक्षा दीक्षा केरकर, प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश दरेकर, स्थानिक नगरसेविका योगिता पाटील, नगरसेवक जितेंद्र पटेल, नगरसेविका आदिती खुरसंगे, नगरसेविका, तेजस्वी घोसाळकर, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, सहायक आयुक्त (आर उत्तर) विभाग रोहित त्रिवेदी, मुख्य अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) (प्रभारी) सुनील रसाळ यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्यास होती.


प्रकल्पाचे वैशिष्ट्य:


दहिसर नदी पुनरूज्जीवन प्रकल्प (टप्पा क्रमांक १)


मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेला दहिसर नदी पुनरूज्जीवन व सौंदर्यीकरण प्रकल्प (टप्पा १) पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश नदीतील सांडपाणी अडवणे, नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारणे आणि नदी परिसरातील नागरी पर्यावरण अधिक सक्षम व स्वच्छ करणे हा आहे.


दहिसर नदी पुनरूज्जीवन व सौंदर्यीकरण प्रकल्प (टप्पा १) अंतर्गत दहिसर नदीलगत अत्याधुनिक, पूर्णतः स्वयंचलित मेम्ब्रेन बायोरिएक्टर तंत्रज्ञानावर आधारित दोन मलनि:सारण प्रक्रिया केंद्र उभारण्यात आली आहेत. त्यापैकी एक (१.५) एमएलडी क्षमतेचे केंद्र सुकुरवाडी, बोरिवली (पूर्व), दुसरे केंद्र (५ एमएलडी) मल:निसारण प्रक्रिया केंद्र इंदिरानगर, दहिसर (पश्चिम) येथे उभारण्यात आले आहे.



दोन्ही मलनि:सारण प्रक्रिया केंद्रातील बांधकाम व यांत्रिक कामे पूर्ण झाली आहेत. आगामी १५ वर्षांसाठी प्रचालन व परिरक्षण प्रक्रियेची जबाबदारी यामध्ये सोपविण्यात आली आहे. या केंद्रामध्ये प्रक्रिया केलेले पाणी बागेसाठी, रस्ते स्वच्छता, औद्योगिक वापर, तसेच इतर वापरासाठी करणे शक्य आहे. या पाण्याच्या उपलब्धतेमुळे शाश्वत जलव्यवस्थापनाला चालना मिळणार आहे.


प्रकल्पाचा उद्देश हा ४.७५ किमी. नदीपात्र सुधारणा हा आहे. एकूण ४.४ किमी. लांबीच्या मलनिस्सारण वाहिन्यांचे बांधकाम या प्रकल्प अंतर्गत करण्यात येणार आहे. कोरड्या हवामानातील प्रवाह वळण्यासाठी इंटरसेप्टर्सची उभारणी या प्रकल्प अंतर्गत करण्यात येईल. तसेच सेवा रस्त्यांचा विकास आणि रस्त्याच्या लगतच्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचे बांधकाम या प्रकल्प अंतर्गत करण्यात येईल. नदीत जाणारे सांडपाणी या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात कमी होईल. प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरण गुणवत्ता आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत होणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai Rain : मुंबईकरांनो सावधान! आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'

मुंबई : मुंबई (Mumbai) शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून बुधवारी (२३ जुलै) पावसाची

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता मुंबई : महसूल

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल