Saturday, May 9, 2026

Nitesh Rane : धर्मांतराला साथ देणाऱ्या राजकीय पक्षांची मान्यता रद्द करा; मंत्री नितेश राणे यांची आग्रही मागणी

Nitesh Rane : धर्मांतराला साथ देणाऱ्या राजकीय पक्षांची मान्यता रद्द करा; मंत्री नितेश राणे यांची आग्रही मागणी

- 'कॉर्पोरेट जिहाद' प्रकरणातील आरोपी निदा खानच्या समर्थनावरून ‘एमआयएम’वर टीका

मुंबई : नाशिकमधील टीसीएस कंपनीत घडलेल्या 'कॉर्पोरेट जिहाद' प्रकरणातील आरोपी निदा खानचे समर्थन करणाऱ्या ‘एमआयएम’वर मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शनिवारी जोरदार प्रहार केला. "हिंदू मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या निदा खानसारख्या आरोपीला वाचवण्यासाठी काही राजकीय पक्ष आणि संघटना उघडपणे मैदानात उतरल्या आहेत. अशा जिहादला समर्थन देणाऱ्या राजकीय पक्षांची मान्यता निवडणूक आयोगाने तातडीने रद्द केली पाहिजे," अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

पुणे जिल्ह्यातील एखतपूर-मुंजवडी येथे आयोजित 'विराट हिंदू संमेलना'त ते बोलत होते. नितेश राणे म्हणाले, "हिंदू धर्माच्या नावाने जर कोणी चुकीचे काम किंवा स्वतःचे दुकान चालवत असेल, तर त्याचे समर्थन हिंदू कधीही करत नाहीत आणि करूही नये. मग ते अशोक खरात प्रकरण असो किंवा अन्य कोणतेही. अशा प्रकरणातील आरोपींना जेव्हा न्यायालयात नेले जाते, तेव्हा त्यांच्या समर्थनार्थ हिंदू समाज कधीही रस्त्यावर उतरून आंदोलने करत नाही".

पण दुसरीकडे, नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहाद घडवून हिंदू तरुणींचे धर्मांतर करण्यात आले. हे दुष्कर्म करणाऱ्या निदा खानला वाचवण्यासाठी हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आणि छत्रपती संभाजी नगरमधील स्थानिक नगरसेवक सक्रिय झाले आहेत. एका गुन्हेगाराला आश्रय देण्याचे काम या पक्षाकडून होत आहे. ज्या पक्षाचा नगरसेवक धर्मांतर प्रकरणातील आरोपीला आसरा देतो, अशा पक्षांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे," असेही राणे म्हणाले.

हिंदूंनो सतर्क व्हा!

कॉर्पोरेट क्षेत्रात शिरकाव करून कशा प्रकारे धर्मांतराची जाळी विणली जात आहेत, याकडे लक्ष वेधताना राणे यांनी हिंदू समाजाला सतर्क राहण्याचे आवाहन केले. या संमेलनाला मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते. केवळ ग्रामीण भाग किंवा आदिवासी पाड्यांपर्यंत मर्यादित न राहता, आता सुशिक्षित वर्गाला लक्ष्य करण्यासाठी कॉर्पोरेट जिहादच्या माध्यमातून छुपे अजेंडे राबवले जात आहेत. नोकरीचे आमिष, पदोन्नतीचे प्रलोभन आणि इस्लामचा उदोउदो करून आपल्या तरुण पिढीला स्वधर्मापासून दूर नेण्याचे षडयंत्र आखले जात आहे. जर आपण आजच सावध झालो नाही, तर भविष्यात आपल्या सांस्कृतिक अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे आपापल्या कार्यक्षेत्रात सजग राहून धर्माभिमान जपण्याचे आणि अशा शक्तींना वेळीच ओळखून संघटितपणे प्रतिकार करण्याचे आवाहन मंत्री राणे यांनी केले. या संमेलनाला मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते.

Comments
Add Comment