Thursday, May 7, 2026

India's First 'All-Weather Subway : भिवंडीत साकारतोय देशातील पहिला 'ऑल वेदर सबवे': रेल्वे रुळ ओलांडण्याच्या समस्येवर कायमचा तोडगा!

India's First 'All-Weather Subway : भिवंडीत साकारतोय देशातील पहिला 'ऑल वेदर सबवे': रेल्वे रुळ ओलांडण्याच्या समस्येवर कायमचा तोडगा!
मुंबई : वेळ वाचवण्याच्या नादात रेल्वे रुळ ओलांडून जीव धोक्यात घालणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. लोकल प्रवासादरम्यान शॉर्टकट मारण्याची सवय अनेकदा प्राणाणावर बेतते, आणि पावसाळ्यात तर हा धोका कैकपटीने वाढतो. अपघातांचे हे सत्र कायमचे थांबवण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आता एक ऐतिहासिक आणि नाविन्यपूर्ण पाऊल उचलले आहे.

पावसाळ्यापूर्वीच उद्घाटनाची शक्यता

रेल्वे रुळांवरून रस्ता ओलांडताना होणारी जीवितहानी रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पादचारी पुलांना (FOB) एक नवा आणि सुरक्षित पर्याय शोधला आहे. साधारणतः रेल्वे स्थानकांवरील फूटओव्हर ब्रिज हे रुळांपासून ७-८ मीटर उंचीवर असतात. पायऱ्या चढण्याचा कंटाळा आल्याने अनेक प्रवासी पुलाचा वापर न करता थेट रुळांवरून चालत जातात, ज्यामुळे दरवर्षी शेकडो अपघात होतात. या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून आता थेट रेल्वे रुळांच्या खालून भुयारी मार्ग (सबवे) बांधण्यात येत आहे. देशातील हा पहिलाच 'ऑल वेदर सबवे' (India's First 'All-Weather Subway ) कोणत्याही ऋतूत वापरण्यायोग्य भिवंडीत साकारत असून, येत्या पावसाळ्यापूर्वीच तो प्रवाशांच्या सेवेत रुजू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

देशातील अशा प्रकारचा पहिलाच अभिनव प्रयोग

रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांची गांभीर्याने दखल घेत, रेल्वेने रुळांच्या खाली तब्बल ४ मीटर खोलीवर हा अत्याधुनिक भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या मार्गामुळे प्रवाशांना आता आपला जीव धोक्यात न टाकता सुरक्षितपणे एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाता येईल. साधारणपणे पावसाळ्यात सबवेमध्ये पाणी साचणे आणि अंधार होणे अशा समस्या नेहमीच उद्भवतात. मात्र, भिवंडीतील या नव्या सबवेच्या निर्मितीत विशेष काळजी घेण्यात आली आहे. हा सबवे पूर्णपणे जलरोधक (Waterproof) असावा, यासाठी अत्याधुनिक 'थ्री-लेअर वॉटरप्रूफ' (तीन स्तरीय) तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. तसेच, सबवेच्या जोडणीच्या ठिकाणी 'रबर गॅस्केट' बसवले जात असल्याने पावसाचे एक थेंबही पाणी आत झिरपणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे.

या प्रकल्पासाठी भिवंडीचीच निवड का?

या महत्त्वाकांक्षी आणि देशातील पहिल्या प्रयोगासाठी भिवंडीची निवड करण्यामागे एक तांत्रिक आणि व्यावहारिक कारण आहे. भिवंडी परिसरातील या मार्गावरून उपनगरीय लोकल गाड्या, मेल-एक्स्प्रेस आणि मालगाड्या अशा तब्बल सात वेगवेगळ्या रेल्वे लाईन्स जातात. सर्वाधिक वर्दळीच्या आणि गुंतागुंतीच्या या मार्गावर जर हा 'सबवे' प्रकल्प यशस्वी झाला, तर भविष्यात देशातील इतर भागातही असे प्रकल्प राबवणे अत्यंत सोयीचे ठरेल. विशेष म्हणजे, खालून भुयारी मार्ग काढला तरी वरून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचा भार सुरक्षितपणे पेलला जावा आणि रुळांची भक्कमता अबाधित राहावी, यासाठी रुळांखाली अतिशय मजबूत लोखंडी गर्डर (Iron Girder) बसवण्यात आले आहेत. यामुळे वरून सुसाट रेल्वे धावेल आणि खालून प्रवाशांचा प्रवास सुरक्षितपणे पार पडेल!
Comments
Add Comment