Thursday, May 7, 2026

Dindori : बारा बळींनंतरही दिंडोरी बांधकाम विभागाकडून उपाययोजना शून्य

Dindori : बारा बळींनंतरही दिंडोरी बांधकाम विभागाकडून उपाययोजना शून्य

नाशिक : दिंडोरी (Dindori) येथील विहीर अपघातातील नऊ बळी तसेच मागील वर्षीच्या खड्डा अपघातातील चार जणांचा बळी गेल्यानंतरही शासनाला अजून जाग आलेली नसून, अद्यापही दिंडोरी-नाशिक-वणी रस्त्याच्या कडेला असलेले खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग पुन्हा अपघाताची वाट पाहत आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गेल्या महिन्यात दिंडोरी येथील शिवाजीनगर परिसरात रस्त्यातील विहीर लक्षात न आल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले होते. त्यानंतर चौकशी समित्या नेमण्यात आल्या. जिल्हा व राज्य पातळीवर अपघात प्रतिबंधक उपाययोजनांबाबत चर्चा झाली. मात्र, असे होऊनही खुद्द दिंडोरीत सार्वजनिक बांधकाम विभाग (Dindori Public Works Department) अजूनही निद्रिस्त असल्याचे दिसून येत आहे. १६ जुलै २०२५ रोजी कोशिंबे येथील खरे व गायकवाड कुटुंबियांची कार वणी रस्त्यावरील खड्ड्यात ( चारीत ) पडून चार सदस्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. विहीर अपघाताच्या दिवशीही या घटनेची चर्चा झाली होती. मागील वर्षी दिंडोरी-वणी रस्त्यावर ज्या ठिकाणी अपघात झाला होता, त्या ठिकाणी केवळ थोडाफार मुरूम टाकण्यात आला. आजही नवीन तहसील कार्यालयाच्या पुढे वळणावर बाजार समितीच्या पटांगणापर्यंत मोठा खड्डा ( चारी ) आहे.

भविष्यात पुन्हा एखादी मोटारसायकल किंवा लहान चारचाकी वाहन या खड्ड्यांमध्ये जाऊ शकते. तसेच पावसाच्या पाण्यामुळे गाळ साचून त्यात कोणी अडकण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या खड्ड्यांचे पुन्हा सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. पुन्हा एखाद्या मोठ्या अपघाताला सामोरे जाण्यापूर्वी दिंडोरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Dindori Public Works Department) अधिकार्‍यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दिंडोरीकरांनी केली आहे.

खड्डे बुजवून प्रकाश परावर्तक बसवावेत : नितीन गांगुर्डे

नाशिक-दिंडोरी-वणी रस्त्यावरील धोकादायक चार्‍यांबाबत यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. विहीर अपघातानंतर नगरपंचायतीनेही परिसरातील धोकादायक ठिकाणांचा सर्व्हे केला आहे. दिंडोरी-वणी रस्त्यालगतच्या चार्‍यांबाबत दिंडोरी नगरपंचायतीच्या विशेष सभेत ठराव करण्यात आला आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाला उपाययोजना करण्याबाबत पत्र दिले जाणार आहे.बांधकाम विभागाने नाशिक-दिंडोरी-वणी रस्त्यालगतच्या चार्‍या तसेच पाटांबाबत धोक्याचे सूचना फलक लावावेत, खड्डे बुजवावेत आणि प्रकाश परावर्तक बसवावेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही माहिती दिली जाणार असल्याचे नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >