अमरावती : देशभरातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे चित्र स्पष्ट होत असून तीन राज्यांमध्ये भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने तब्बल २०० जागांच्या आसपास मुसंडी मारत ममता बॅनर्जी यांची १५ वर्षांची एकहाती सत्ता संपुष्टात आणली आहे. या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष देशभरात साजरा होत असून, मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयातही महिला कार्यकर्त्यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला. या महाविजयानंतर माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका केली आहे. "जो कोणी सनातन आणि भगव्याला विरोध करेल, त्याच्या पाठीशी कोणतेही राज्य उभे राहणार नाही; आज ममता दीदींचा अहंकार धुळीस मिळाला आहे," असा घणाघात राणा यांनी केला.
मुंबई : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मिळालेला ऐतिहासिक विजय हा अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री ...
अमित शहांच्या रणनीतीचा हा विजय
पश्चिम बंगाल निवडणुकीतील भाजपच्या मुसंडीनंतर माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगाल हा देशाचाच अविभाज्य भाग असून तिथल्या जनतेने संपूर्ण देशाला अपेक्षित असा निकाल दिला आहे. आज खऱ्या अर्थाने ममता दीदींचा इतक्या वर्षांचा 'खेला खतम' (खेळ संपला) झाला आहे, अशी घणाघाती टीका राणा यांनी केली. तसेच, या अभूतपूर्व विजयाचे संपूर्ण श्रेय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अचूक रणनीतीला देत त्यांनी भाजपच्या यशाचे कौतुक केले.
आता 'खेला होबे' नाही, ममता दीदींचा 'खेला खतम'...
"सनातन धर्म आणि भगव्या रंगाला जो विरोध करेल, त्याच्या पाठीशी कोणतेही राज्य उभे राहणार नाही. ममता बॅनर्जींनी नेहमी अत्याचार करणाऱ्यांना साथ दिली, पण आज त्यांचा अहंकार पूर्णपणे तुटला आहे. त्यामुळे आता 'खेला होबे' नाही, तर दीदींचा 'खेला खतम' झाला आहे," असा सणसणीत टोला राणा यांनी लगावला. तसेच, या ऐतिहासिक निकालामुळे पश्चिम बंगालमधील होऊन गेलेल्या थोर नेत्यांच्या आत्म्यालाही आज नक्कीच आनंद झाला असेल, अशी भावना नवनीत राणा यांनी व्यक्त केली आहे.
'जय श्रीराम'चा जयघोष अन् हातात रसगुल्ल्याचे डबे...
पश्चिम बंगालसह तीन राज्यांमध्ये मिळालेल्या भाजपच्या दणदणीत विजयाचा उत्साह मुंबईतही पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेच्या भाजप पक्ष कार्यालयात नगरसेवकांनी हातात चक्क बंगालची ओळख असलेले 'रसगुल्ल्याचे डबे' घेऊन अनोख्या पद्धतीने जल्लोष केला. यावेळी 'जय श्रीराम'च्या गाण्यांवर ठेका धरत हेतल गाला, प्रीती साटम आणि शीतल गंभीर या महिला नगरसेविकांनी फुगड्या खेळून विजयाचा आनंद लुटला. तसेच, नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनीही इतर महिला सहकाऱ्यांसोबत एकत्र येत या ऐतिहासिक यशाचे जोरदार सेलिब्रेशन केले.