मुंबई : मुंबईतील पायधूनी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १३ आणि १६ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे.
मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक अंदाजानुसार फूड पॉइझनिंगमुळे ही घटना घडली असावी. संबंधित कुटुंबाने शनिवारी रात्री सुमारे साडेदहा वाजता नातेवाईकांसोबत जेवण केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. प्रकृती खालावल्याने त्यांनी फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेतला असता, त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला.
मृतांची ओळख अब्दुल्ला डोकाडिया (४०), नसरीन डोकाडिया (३५) आणि त्यांच्या मुली आयशा (१६) व झैनब (१३) अशी झाली आहे. पायधूनीतील घाटी गल्ली येथील मुघल बिल्डिंगमध्ये हे कुटुंब राहत होते.
महाराष्ट्रात सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत असून राज्यभर तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठला आहे. मराठवाडा, विदर्भासह अनेक भागांमध्ये उष्णतेचा पारा ...
या घटनेबाबत शेजारील डॉक्टर कुरेशी यांनी सांगितले की, ते सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले असता चौघेही बेशुद्ध अवस्थेत होते आणि घरभर उलट्या झालेल्या होत्या. त्यांनी बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्याचे समजले. तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी कलिंगडावर संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, चारही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून अंतिम अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.