मिरवणूक सनदगुड्डे पडिहोडिबेट्टू येथील मंदिरातून सुरू होऊन टकोडे बार्के येथील एका घराकडे जात होती. मिरवणुकीत २५ जण होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात भाविक अरुंद पादचारी पुलाच्या मध्यावर पोहोचले आणि अतिभारामुळे बीम तुटला आणि पूल कोसळला.
पूल कोसळल्यानंतर पालखी आणि अनेक भाविक सुमारे १० फूट खोल दरीत पडले. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक तात्काळ मदतीसाठी धावले आणि बचावकार्य सुरू केले.जखमींमध्ये हरीश नावाच्या व्यक्तीच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले आहे, तर मरूर येथील सुनील शेट्टी गंभीर जखमी झाले आहेत. उर्वरित सहा जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्व जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, हा पादचारी पूल सुमारे ५० वर्षे जुना होता आणि अत्यंत जीर्ण अवस्थेत होता. प्राथमिक तपासात पुलाचा आधार असलेला बीम कमकुवत झाल्याचे समोर आले असून, त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. आता पुलाची स्थिती, देखभाल आणि सुरक्षा निकष याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनी जुन्या पुलांची वेळोवेळी तपासणी करण्याची मागणी केली आहे.