नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागांपैकी १५२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान झाले. या टप्प्यात ९३.१९ टक्के असे ऐतिहासिक मतदान झाले. उर्वरित १४२ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात २९ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ४ मे रोजी आहे.
पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान झाल्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची धाकधूक वाढली आहे. झालेले मतदान सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या बाजूने आहे की विरोधात यावरून चर्चेला उधाण आले आहे.
पश्चिम बंगालमध्ये १९७७ ते २०११ या ३४ वर्षांच्या कालावधीत साम्यवादी विचारांच्या अर्थात कम्युनिस्ट विचारांच्या पक्षांचीच म्हणजेच डाव्यांची सत्ता होती. यानंतर तृणमूल काँग्रेस सत्तेत आली आणि ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या. ममता बॅनर्जी २० मे २०११ पासून पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आहेत. या सरकार विरोधात भारतीय जनता पार्टी मैदानात उतरली आहे. वारंवार प्रयत्न करूनही भाजपला तृणमूलचा पराभव करणे जमले नाही. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्याच टप्प्यात विक्रमी मतदान झाल्यामुळे भाजपला जिंकण्याची आशा वाटू लागली आहे.
याआधी ९ एप्रिल रोजी आसाम, केरळ आणि पुदुचेरीमध्येही विक्रमी मतदान झाले. आसामध्ये ८५.९१ टक्के, पुदुचेरीमध्ये ९० टक्के आणि केरळमध्ये १९८७ नंतरचे सर्वाधिक ७८.२७ टक्के मतदान झाले. तसेच २३ एप्रिल रोजी तामिळनाडूमध्ये सर्व २३४ जागांवर एकाच टप्प्यात विक्रमी ८४.६९ टक्के मतदान झाले. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये इतिहासात प्रथमच सर्वाधिक मतदान झाले. पाचही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल ४ मे रोजी एकाच वेळी जाहीर केले जातील.
पाचही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल ४ मे रोजी एकाच वेळी जाहीर केले जातील. यामुळे पाचही राज्यांमध्ये तिथले सरकार सत्ता टिकवणार की सत्तांतर होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.





