IMD Guidelines on Heatwave : आयएमडीतर्फे उष्णतेच्या लाटेबाबत सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जारी

- पुढील सात दिवस अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम राहण्याची शक्यता


मुंबई : देशाच्या अनेक भागांमध्ये सतत वाढणारे तापमान आणि सरासरीपेक्षा जास्त उष्ण हवामान पाहता, पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) उष्णतेच्या लाटेबाबत सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचना जारी केल्या आहेत.


ताज्या अध्ययनानुसार, वायव्य, मध्य आणि द्वीपकल्पीय भारताच्या अनेक भागांत कमाल तापमान सध्या 40°C ते 44°C च्या दरम्यान असून, श्री गंगानगर (राजस्थान) येथे सर्वाधिक 44.5°C तापमानाची नोंद झाली आहे. अनेक प्रदेशांमध्ये तापमानात सरासरीपेक्षा 5°C किंवा त्याहून अधिक वाढीची नोंद झाली आहे. ही बाब, देशाच्या काही भागांमध्ये उष्णतेची काहिली वाढल्याची निदर्शक आहे.


येत्या काही दिवसांत जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, चंदीगढ आणि दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान तसेच मध्य भारताच्या काही भागांत उष्णतेची लाट निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचे हवामान विभागाने सूचित केले आहे. त्याच वेळी, किनारपट्टी आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे, तर उत्तर भारताच्या काही भागांत रात्रीचे तापमान अधिक राहण्याची शक्यता असून, त्यामुळे जीवाची काहिली आणि आरोग्यविषयक तक्रारी जाणवण्याचा धोका वाढू शकतो.


वायव्य भारतात 27 एप्रिल पर्यंत कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही आणि त्यानंतर तापमानात हळूहळू घट होईल. तर मध्य आणि इतर भागांमध्ये या काळात तापमानात सुरुवातीला वाढ आणि त्यानंतर घट दिसून येऊ शकते, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


एकंदर परिस्थिती लक्षात घेता, उष्णतेच्या लाटेपासून सुरक्षित राहण्यासाठी भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत आणि नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये थेट सूर्यप्रकाशात जास्त वेळ राहणे टाळणे, विशेषतः दुपारच्या वेळी पुरेसे पाणी पिणे, हलके आणि सुती कपडे घालणे आणि उच्च तापमानाच्या काळात घराबाहेरील कष्टाची कामे टाळणे यांचा समावेश आहे. लहान मुले, वृद्ध आणि आधीपासूनच आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


उष्णतेशी संबंधित आजार, जसे की उष्णतेमुळे येणारा थकवा आणि उष्माघाताचा धोका कमी करण्यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, यावर भारतीय हवामान विभागाने भर दिला आहे. आयएमडी च्या अंदाजानुसार, पुढील सात दिवस अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.


विशेषतः खालील भागांमध्ये ही स्थिती असेल: वायव्य भारत (पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश); मध्य भारत (मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ); दक्षिणेकडील निवडक प्रदेश (केरळ आणि माहे) याव्यतिरिक्त, ओदिशा, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश यांसारख्या किनारपट्टीवरील राज्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील प्रदेशांमध्ये रात्रीच्या वेळीही उष्ण वातावरण कायम राहू शकते, ज्यामुळे रात्रीच्या वेळी जाणवणारा उष्म्याचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.


भारतीय हवामान विभागाच्या हंगामी अंदाजानुसार, एप्रिल ते जून 2026 दरम्यान पूर्व, मध्य आणि वायव्य भारताच्या काही भागांत, तसेच आग्नेय द्वीपकल्पीय प्रदेशात सामान्यपेक्षा अधिक उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे; यामुळे सध्या सुरू असलेल्या उष्ण हवामानाच्या वातावरणात, नियमित खबरदारी घेण्यासह उपाययोजनांची आवश्यकता प्रामुख्याने आहे.



भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) उष्णतेच्या लाटेबाबतची सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे अधिकृत संकेतस्थळावर (https://mausam.imd.gov.in/responsive/heatwave_guidance.php) जनतेच्या माहितीसाठी आणि प्रसारासाठी उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये, काय करावे आणि काय करू नये, पूर्वतयारीच्या उपाययोजना आणि विविध क्षेत्रांसाठीच्या विशेष सूचनांचा समावेश आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश व्यक्ती, समुदाय आणि स्थानिक प्रशासनांना आरोग्याशी संबंधित धोके कमी करण्यात आणि उष्णतेच्या तीव्र परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता वाढवण्यात मदत करणे हा आहे.


भारतीय हवामान विभाग तापमानातील बदलांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि वेळीच हवामानाचे अंदाज व इशारे जारी करत आहे. त्यामुळे नागरिकांना अधिकृत स्रोतांद्वारे अद्ययावत राहण्याचा आणि दिलेल्या सुरक्षा उपायांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Meerut Husband Murder Case : विषारी साप आणि प्रेमाचा आव! प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा कट

20 लाखांच्या विम्यासाठी पतीच्या हत्येचा कट; पत्नीसह चौघांविरोधात गुन्हा, तपासात धक्कादायक दावा मुंबई : उत्तर

Kailash Mansarovar Yatra : मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रा मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद; २०० हून अधिक प्रवासी अडकले

नवी दिल्ली : सीमावर्ती पिथौरागढ जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ऐतिहासिक

Aadhaar App : आधार ॲपने ओलांडला ४ कोटी डाउनलोड्सचा टप्पा

नवी दिल्ली : आधार ॲपने 4 कोटी डाउनलोड्सचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. यातून नागरिकांचा सोयीस्कर आणि डिजिटल

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाकडून 'दुय्यम श्रेणीचा प्रवासी' शब्दावर आक्षेप, अपघातग्रस्ताच्या कुटुंबाला ८ लाखांची नुकसान भरपाई

नवी दिल्ली : रेल्वे अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने 'दुय्यम श्रेणीचा प्रवासी' या शब्दप्रयोगावर आक्षेप घेत

Krishna Temple : श्रीकृष्ण चरणी भक्ताने अर्पण केली २० लाखांची सोन्याची बासरी

राजस्थान : राजस्थानात चित्तोडगड जिल्ह्यातील मेवाडचे प्रसिद्ध श्री सावळिया सेठ मंदिरात जयपूर येथील एका भाविक

Ahmedabad : अहमदाबादमधील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू

Ahmedabad : अहमदाबाद मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील महमूदपुरा (Mahmudpura)