मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्या गाडीच्या टायरची हवा सोडली. निरुपम यांच्या दिशेने बाटल्या फेकत आपली स्टाईल दाखवून दिली. या राड्याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी मनसेच्या ११ जणांना अटक केली होती. अटक केलेल्या सर्वांची २४ तासांच्या आत जामिनावर सुटका झाली आहे.
पोलिसांनी मनसेच्या ११ कार्यकर्त्यांच्या विरोधात दंगल घडवणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, मालमत्तेचे नुकसान करणे, जाणूनबुजून इजा करणे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण करणे अशा आरोपांतर्गत गुन्हा नोंदवला होता. पण प्रत्येकी सहा हजार रुपयांच्या जातमुचालक्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांची जामिनावर सुटका झाली.
राज्यात १ मे पासून रिक्षा, टॅक्सी आणि खासगी कॅब चालकांना मराठी भाषेतून संवाद साधणे सक्तीचे असेल. या संदर्भातला निर्णय राज्याच्या परिवहन विभागाने घेतला आहे. या निर्णयावर शिवसेनेचेच माजी खासदार संजय निरुपम यांनी समतोल भूमिका घेतली आहे. परवाने रद्द करण्याऐवजी व्यावहारिक मराठीचे प्रदक्षिण द्या. ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांना प्रशिक्षण द्या, एकदम परवाने रद्द करून अन्याय करू नका, असे निरुपम म्हणाले. पण निरुपम यांची भूमिका मनसेच्या पचनी पडलेली नाही.
दहिसरमध्ये निरुपम जेव्हा रिक्षाचालकांशी संवाद साधायला पोहोचले, तेव्हा मनसैनिकांनी त्यांच्या गाडीची हवा सोडत आणि बाटल्या फेकत आपली 'स्टाईल' दाखवून दिली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. अमित ठाकरे यांनी तर थेट इशारा दिलाय की, "मराठी सक्तीला विरोध कराल, तर मनसे स्टाईलने धडा शिकवू." यावर निरुपम यांनीही पलटवार करत मनसेची 'गुंडगिरी' खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिलाय.
मनसे आणि निरुपम यांच्यात तणावाचे वातावरण असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मराठी येणं अनिवार्य आहेच, मात्र कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही'; असे सांगत नाव न घेता मनसेला दटावले आहे. या पार्श्वभूमीवर आता १ मे रोजी काय होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.






