मुंबई : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी संघटनात्मक फेररचना करण्यात आली असून पक्षाच्या नेतृत्वाची धुरा आता तीन पातळ्यांवर विभागण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ही नवी व्यवस्था लागू केली असून, सुनेत्रा, पार्थ आणि जय पवार यांच्यात जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. भविष्यात उद्भवू शकणारा कोणताही राजकीय धोका टाळण्याचा आणि पक्षावर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न यामागे असल्याचे बोलले जात आहे.
नव्या रचनेनुसार, सुनेत्रा पवार या स्वतः राज्यभर दौरे करून थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून पक्ष संघटनेची घडी बसवण्यावर त्यांचा भर असेल. दुसरीकडे, खासदार पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईतील राजकीय कामकाजाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रीय पातळीवरील संपर्क आणि केंद्र सरकारशी समन्वय साधण्यासाठी पार्थ पवार यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. तर अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांच्याकडे बारामती आणि पुणे ग्रामीण भागाची जबाबदारी सोपवून त्यांच्याकडे स्थानिक बालेकिल्ला अबाधित राखण्याचे काम देण्यात आले आहे. जय पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून बारामती परिसरात जनसंपर्क वाढवला असून, आगामी काळात त्यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरेल असे मानले जात आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात काही ज्येष्ठ नेत्यांनी नेतृत्वासाठी हालचाली सुरू केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, कोणत्याही बाहेरील नेत्याकडे पक्षाची सूत्रे न देता ती कुटुंबातच ठेवण्याचा पवारांचा हा पवित्रा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पार्थ पवार सध्या राज्यसभा सदस्य म्हणून राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत, तर जय पवार यांनी बारामतीत संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे. या दोन्ही युवा नेत्यांच्या सक्रियतेमुळे पक्षात आता दुसऱ्या पिढीचे नेतृत्व पुढे येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अंतर्गत राजकारण तापण्याची चिन्हे
दरम्यान, या नव्या बदलांमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण अधिक तापण्याची चिन्हे आहेत. बारामती पोटनिवडणुकीच्या धामधुमीत २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या चर्चा आतापासूनच सुरू झाल्या आहेत. कार्यकर्त्यांची मागणी असल्यास जय पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत मिळत असतानाच, आमदार रोहित पवार यांनी भविष्यात 'पवार विरुद्ध पवार' अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली आहे. या विधानामुळे आगामी काळात बारामतीसह राज्यातील राजकारण कोणत्या दिशेला वळणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.






