मुंबई : महाराष्ट्रातील हवामान विचित्र होत चालला आहे, कधी कडाक्याचं ऊन तर कधी पाऊस, ऋतुचक्र बिघडत आहे आणि याचा परिणाम म्हणून उष्माघात यांसारखे त्रास जाणवू लागले आहेत. महाराष्ट्र सध्या दोन भागात विभागाला गेला आहे, एका भागात पाऊस आणि दुसऱ्या भागात ऊन. विदर्भात उष्णेतची लाट कायम असून, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे, तसेच काही जिल्ह्यांना यलो अलर्टही देण्यात आला आहे.
सूर्याचा तडाखा ४४ अंश पार
राज्यात उन्हाचा तडाखा अधिक तीव्र झाला असून वर्धा, अकोला, गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये पारा ४४ अंशाच्या पार गेला आहे. तसेच जळगाव, नागपूर, वाशीमध्येही तापमान ४२ अंशापर्यंत पोहोचला आहे.
अवकाळी पाऊस का पडतोय
महाराष्ट्राच्या हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे की, मध्य प्रदेशात वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे, तसेच विदर्भा पासून कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. ईशान्य भारतात समुद्र सपाटीपासून १२.६ किलोमीटर उंचीवर ताशी ९० ते १२० नॉट्स वेगाने जोरदार वारे वाहत आहेत. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात अवकाळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, बीड, धाराशिव, आणि लातूर या जिल्ह्यांत सोसाट्याचा वर आणि मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गारपिटीचा इशारा
घाटमाथा, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई ठाण्यात आद्रता वाढणार
पुढील दोन दिवस मुंबई, ठाणे, रायगड या ठिकाणी केवळ उष्णता नसून आद्रतेचाही त्रास होणार आहे. तसेच हलका आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आली आहे.