मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने गोरेगाव येथे नोकरदार महिलांसाठी वसतीगृह सुरु करण्यात आल्यानंतर आता कांदिवली आकुर्ली गाव येथे विद्यार्थीनींसाठी वसतीगृह बांधण्यात आले आहे. तळ अधिक पाच मजल्यांच्या या इमारतीत १८ वर्षांवरील विद्यार्थीनींची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला महापालिकेच्या सुधार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या वसतिगृहाची देखभाल आणि व्यवस्थापन राखण्यासाठी जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन यां सस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे.
कांदिवली पूर्व येथील आकुर्ली गाव येथे १६४२ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर तळ अधिक पाच मजल्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून ही इमारत महापालिकेच्या नियोजन विभागाच्या ताब्यात आल्याने आता याठिकाणी विद्यार्थींनींचे वसतीगृह सुरु करण्याचा निर्णय घेता आहे. या वसतिगृहात १८ वर्षांवरील विद्यार्थींनींना प्रवेश दिला जाणार असून त्यांच्या निवासासाठी ४५ खोल्यांची रचना केली आहे. त्यामध्ये एकूण १३५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
या मुलींचे वसतीगृह चालण्यासाठी महापालिकेच्या नियोजन विभागाच्यावतीने इच्छुक संस्थांकडून अर्ज मागवण्यात आले होते. यामध्ये चार संस्थांनी भाग घेतला होता आणि त्यामध्ये जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन या संस्थेची निवड करण्यात आली आहे. या संस्थेकडे विद्यार्थीनी वसतीगृह चालवण्याचा ११ वर्षांचा अधिकार आहे. या संस्थेच्यावतीने बेड, गाद्या, उशी, बेडशीट, चादर इत्यादी पुरवण्यात येणार आहे, याशिवाय जेवणाची सुविधा, विद्यार्थींनींना पुरवण्यात येणाऱ्या चांगल्या पोष्टिक जेवणाची काळजी घेतली जाणार आहे. या वसतीगृहातील मुलींना रोज सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण,व रात्रीचे जेवण यासाठी आवश्यक असलेले शुल्क संस्थेमार्फत आकारले जाणार आहे. वीज बिल, स्वच्छता संस्थेच्यावतीने केला जाईल आणि मालमत्ता कर महापालिकेच्यावतीने भरला जाणार आहे. सध्या या संस्थेची प्रथम ११ महिन्यांकरता नेमणूक करण्यात आली असून पुढील ११ महिन्यांकरता २० वेळा मुदतवाढ दिली जाणार आहे.