अहिल्यानगर : दशक्रियाविधी मृत्यू नंतर केली जाते पण जिवंतपणीच कोणी दशक्रियाविधी केल्याचं तुमच्या ऐकण्यात किंवा पाहण्यात आलंय का ? तर नाही असं अनेकांचं उत्तर असेल. पण नेवासा ( Ahilyanagar ) येथील सौंदाळा गावात हे घडलंय आणि हे केलंय ते एका सरपंचाने. माणूस मेल्यानंतर केल्या जाणाऱ्या क्लेशदायक कर्मकांडांना फाटा देण्यासाठी आणि समाजातील अंधश्रद्धेवर प्रहार करण्यासाठी नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावच्या सरपंचाने ( Saudala sarpanch) चक्क स्वतःच्या हयातीतच स्वतःचे 'पिंडदान' आणि 'दहाव्याचा' विधी उरकला आहे.
सरपंच शरद आरगडे यांनी जिवंतपणीच स्वतःचा दशक्रिया विधी घालून पिंडदान करत सामाजिक रुढी, अंधश्रद्धेला तिलांजली दिली आहे.. आरगडे यांची पत्नी प्रियंका आणि मुलगा संग्राम यांनी भेंडा येथील स्मशानभूमीत सत्यशोधक पद्धतीने पिंडदान विधी पार पाडला. यावेळी शरद आरगडे यांच्या पिंडाला कावळाही शिवला.
https://prahaar.in/2026/04/23/ashok-kharat-case-kaka-koyate-resign-as-president-of-maharashtra-state-credit-society-federation/
हिंदू धर्मात व्यक्तीच्या निधनानंतर दहाव्या दिवशी पिंडदान आणि उत्तरकार्य करण्याची प्रथा आहे. मृत्यूनंतर अस्थी विसर्जन, दशक्रिया, तेरावा विधीसाठी अवाजवी खर्च केला जातो. माणूस जिवंत असताना मात्र, त्याच्या गरजांकडे बहुतांशी वेळा दुर्लक्ष केले जाते, त्याच्या मृत्यूनंतर मात्र, समाज नाव ठेवू नये, यासाठी बहुतांशी जण मोठा खर्च करतात.मृत्यूनंतर आत्मा शांत होतो किंवा ठरावीक विधी केल्यानंतरच त्याला मोक्ष मिळतो, अशी समजूत समाजामध्ये आहे.. लोकांमधील असे गैरसमज दूर करण्यासाठी आपण जिवंतपणीच स्वतःचे पिंडदान करत असल्याचे आरगडे यांनी सांगितले.
जिवंतपणी स्वतःचे पिंडदान करून त्यांनी केवळ मृत्यूचे भय घालवले नाही, तर समाजातील कालबाह्य परंपरांना एक प्रकारे 'मूठमाती' देण्याचे काम केले आहे. केवळ पिंडदान करून न थांबता, शरद आरगडे यांनी समाजात स्त्रियांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीवरही प्रहार केला आहे. "माझ्या निधनानंतर माझ्या पत्नीने कोणत्याही विधवा प्रथा पाळू नयेत, तिने कुंकू पुसू नये, बांगड्या फोडू नयेत किंवा मंगळसूत्र उतरवू नये," असे स्पष्ट नमूद करणारे कायदेशीर प्रतिज्ञापत्र देखील त्यांनी तयार केले आहे.
दरम्यान, या प्रतिज्ञापत्रात त्यांनी पुढे म्हटले आहे की, त्यांच्या मृत्यूनंतर कोणतेही सुतक पाळले जाऊ नये किंवा धार्मिक कर्मकांड करू नये. पतीच्या निधनानंतर पत्नीला सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार असून, समाजातील जाचक रूढींनी तिला अडकवू नये, हा क्रांतिकारी विचार त्यांनी या माध्यमातून मांडला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे स्त्री सन्मानाचा एक नवा पायंडा पडताना दिसत आहे.